रामल्ला / वृत्तसंस्था
पॅलेस्टाईनमधील भारतीय राजदूत मुकुल आर्य यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याबाबत अधिक माहिती समोर आली नाही. तथापि, रामल्ला येथील भारतीय दुतावासात त्यांचा मृतदेह आढळला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आर्य यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. पॅलेस्टाईनमधील भारतीय प्रतिनिधी मुकुल आर्य यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला आहे. ते एक प्रतिभावान अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्र परिवाराच्या दुःखात देश सहभागी आहे, असे ट्विट परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.
मुकुल आर्य यांच्या निधनासंबंधी पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करत शोक व्यक्त केला आहे. आम्ही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात असून त्यांचे पार्थिव भारतात पाठवण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले. पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास, पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांनी आरोग्य आणि फॉरेन्सिक अधिकाऱयांसह सुरक्षा जवानांना, पोलिसांना रामल्ला येथील भारतीय राजदुतांच्या निवासस्थानावर दाखल होण्याचे निर्देश दिले होते. मुकुल आर्य यांच्या मृत्यूबाबत अधिक माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले असून पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणांकडून पुढील तपास केला जात आहे.
काबूल, मॉस्को, पॅरिसमध्ये यशस्वी सेवा
मुकुल आर्य हे 2008 च्या बॅचमधील भारतीय विदेश सेवा विभागातील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी काबूल आणि मॉस्को येथील भारतीय दुतावासांमध्ये सेवा बजावलेली आहे. तसेच पॅरिसमध्ये ‘युनेस्को’च्या स्थायी प्रतिनिधीमंडळातही त्यांनी उत्तम कामगिरी निभावलेली आहे. विदेशातील सेवेबरोबरच दिल्लीतील विदेश मंत्रालयाच्या मुख्यालयातही त्यांनी काही काळ काम केले आहे.