सर्वसामान्य माणसाचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. हा जागतिक पातळीवरील घडामोडींचा परिणाम आहे, असे म्हणून कानाडोळा करता येणार नाही. भारताने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर सर्वच क्षेत्रात ज्या पद्धतीने वाटचाल करायला हवी होती, तशी ती झालेली नाही. ‘ग्लोबल टु लोकल’ म्हणजे ‘ग्लोकल इफेक्ट’मुळे सामान्य माणूस जेरीस आला आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार; महागाईवर मात करण्यासाठी कोणतेही निश्चित असे धोरण त्यांच्याकडे नाही. जागतिक पटलावरील घडामोडी एका दिवसात घडत नसतात, त्यांची तीव्रता आणि परिणाम सरकारला समजत नाहीत, असे नसते. तरीदेखील त्यावर उपाय करण्याच्यादृष्टीने हालचाली होत नाहीत हे दुर्दैवी आहे. अन्नधान्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. केवळ गव्हाचे उदाहरण घ्यायचे तर क्वींटलमागे पाचशे रुपयांनी तो महागला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 13.11 टक्क्मयांवर पोहचला आहे. वास्तविक, जनतेला निर्देशांक समजत नाही आणि टक्केवारीही. त्यांना फक्त आपल्या खिशाला किती झळ बसली आहे ते चटका बसल्यासारखे जाणवते. मागच्या वर्षभरापासून म्हणजे एप्रिल 2021 पासून महागाई दर सतत दुहेरी अंकात राहिला आहे. जानेवारीत तो 12.96 टक्के होता. युपेन आणि रशियातील युद्धामुळे जगभरातच महागाईचा आगडोंब उसळला आहे, असे म्हणून सरकारला सुटका करून घेता येणार नाही. खनिज तेल, रसायने, कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायूच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढल्याचे सांगितले जाते. ते खरेही असेल. मात्र, युद्ध काही अचानक सुरू झालेले नाही. भारताने चीन आणि पाकिस्तानशी युद्ध केले आहे, त्यामुळे होणारे नुकसान सोसले आहे. आता जग जवळ येत असल्याने कोणत्याही देशांमधील संघर्षाच्या झळा बसू शकतात. त्यासाठी सरकारने तयारीत असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील विविध देशांमध्ये दौरे करतात. त्यांच्याशी स्नेहसंबंध राखतात, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचा अनुकूल परिणाम भारतीयांना जाणवायला हवा. साध्या भाजीपाल्यापासून सगळय़ा वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कोंबडीखाद्याच्या दरवाढीमुळे कुक्कुटपालन क्षेत्रास फटका बसला आहे. पिढी बदलल्यानंतर भारतामध्ये मांसाहाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहेत. त्यातही चिकनप्रेमींची संख्या वाढली आहे. कुक्कुटपालन क्षेत्रास फटका बसण्याने गोरगरीबांच्या खिशाला चाट बसणार आहे. कारण कोंबडीच्या अंडय़ांचा आहारात उपयोग करणाऱयांमध्ये गरीबांची संख्याही जास्त आहे. कमी पैशात जास्त पोषणमूल्य असणाऱया अंडय़ांच्या किमतीतील वाढ म्हणूनच सहनशीलतेपलीकडची असते. कोंबडय़ांच्या खाद्यात जवळपास साठ टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अंडय़ांचा उत्पादन खर्च वाढला. ग्राहकाची आर्थिक स्थिती पाहता, अंडय़ांचा दर भरमसाठ वाढवूनही चालत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ आणि विक्रीदर मात्र कमी, अशी स्थिती उद्भवली आहे. तीच स्थिती मासे आणि मांसाच्या दराची आहे. इंधन दरवाढीमुळे शेतमालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. डाळींचे दर भरमसाठ वाढले. सर्व प्रकारच्या डाळींमध्ये किमान पाच रुपयांची वाढ झाली आहे. कोविडच्या लाटांवर लाटांमुळे कौटुंबिक आरोग्याच्या पातळीवर लोक त्रस्त झाले आहेत. अनेकांना आपल्या जीवाभावाच्या माणसांना मुकावे लागले आहे, त्याचे दुःख मोठे आहे. खर्चाने कंबरडे मोडणाऱया या काळात समाजमनावर विपरित परिणाम होत असल्याचे आढळत आहे. आर्थिक ताणामुळे परस्परांमधील मैत्रभाव आटल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे बिघडलेली परिस्थिती मूळ पदावर येण्याची चिन्हे नजीकच्या काळात दिसत नाहीत. कारण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. हे लोण युरोपात पसरत आहे. भारतालाही जागरूक राहावे लागणार आहे, कारण जून महिन्यात चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या तीन वर्षांत कोरोनामुळे सगळय़ाच क्षेत्रांना फटका बसला आहे. एकटय़ा पर्यटन क्षेत्रातील सुमारे दोन कोटी लोकांचा रोजगार बुडाल्याची माहिती संसदेमध्ये केंद्रीयमंत्री जी. किशनरेड्डी यांनी सांगितली. कोरोनाचे संकट जागतिक असल्याने परदेशी पर्यटक भारताकडे फिरकले नाहीत. देशांतर्गत पर्यटनही कमी झाले. कारण सरकारने प्रवासावर उचित मर्यादा घातलेली होती. पर्यटन व्यवसायात काम करणाऱया उद्योजकांना हात देण्यासाठी सरकारने पावले उचलली. त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले. अगदी टुरिस्ट गाईडलादेखील त्याचा लाभ देण्यात आला. दुसरीकडे, मुंबईसारख्या महानगरामध्ये प्रॉपर्टी मार्केटमध्ये तेजी आली आहे. प्रॉपर्टीच्या मागणी आणि पुरवठय़ामध्ये वाढ झाली. ‘बिल्डिंग क्लिअरन्स’मधून अब्जावधी रूपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्यातीमध्ये थोडी वाढ झाली आहे. शेअर बाजारात तात्पुरती तेजीमंदी येत राहते. तथापि, मागच्या काळात शेअर बाजार पडलेलाच होता. आता रिटेल क्षेत्रासाठी बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. कपडे, फर्निचर, दागिने, सौंदर्यप्रसाधने, क्रीडा साहित्य उलाढाल वाढली. विक्री वाढल्याने रिटेल बाजारात चलनवलन वाढले हे खरे असले तरी दागिने किंवा सौंदर्यप्रसाधने ही सर्वसामान्यांची गरज कधीच नव्हती. भारतात कोरोनामुळे ऑनलाईन खरेदी मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहे हे खरे आहे, पण स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. युद्ध आणि कोरोनाच्या साथीमुळे हलकल्लोळ उडाला आहे. अशा स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांनी जनतेचे हित डोळय़ापुढे ठेवून महागाई वाढू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत.
Previous Articleजितेंद्र त्यागींची जामीन याचिका फेटाळली
Next Article दशकानुदशके दडविलेले सत्य आले बाहेर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.