राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार प्रारंभ : चार महिन्यांच्या लेखानुदानास घेणार मंजुरी
प्रतिनिधी /पणजी
नूतन सरकारच्या शपथविधी नंतर लगेच दुसऱया दिवशी आठव्या राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दि. 29 आणि 30 मार्च रोजी हे अधिवेशन होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ होईल. दुसऱया दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल.
आठवी विधानसभा आणि नवे सरकार व नवीन वर्षाचे पहिलेच अधिवेशन असल्याने या अधिवेशनात पहिल्या दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अभिभाषण होईल.
दुसऱया दिवशी दि. 30 रोजी प्रथम सभापतीची निवड करावी लागेल. त्यानंतर अर्थसंकल्प मांडण्यात येईल. त्याद्वारे पुढील चार महिन्यांच्या खर्चासाठी लेखानुदान मागण्यांना मंजुरी घेण्यात येईल. नियमांनुसार 31 मार्चपर्यंत अर्थसंकल्प विधानसभेत संमत होणे आवश्यक असते. जुनच्या अखेरीस पावसाळी अधिवेशन घेऊन उर्वरित अर्थसंकल्पास मान्यता घेण्यात येईल.
कायद्याला वाकुल्या दाखवण्याचे प्रयत्न?
दरम्यान, प्रारंभापासूनच सरकारकडून कायद्याला वाकुल्या दाखवण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिवेशनाचा पहिलाच दिवस देखील मुख्यमंत्र्यांनी शपथ न घेताच अधिवेशन घेण्यात आले. गोव्याच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडलेला आहे. आता देखील अधिवेशन बोलावण्यासाठी किमान तीन दिवसांची तरी मुदत देणे आवश्यक होते. परंतु मंत्रिमंडळाचा शपथविधी दि. 28 रोजी सकाळी 11 वाजता होईल. त्यानंतर दुपारी मंत्रिमंडळ बैठक होईल. तेथे अधिवेशनाचा निर्णय घेऊन तो जाहीर करण्यात येईल व दुसऱयाच दिवशी अधिवेशन होईल. यावरून अधिवेशन बोलावण्यासाठी 24 तासांची सुद्धा मुदत मिळत नाही हेच सिद्ध होते.
प्रत्यक्षात केवळ आपत्कालीन प्रसंगीच किमान 24 तासांची मुदत देऊन अधिवेशन बोलावण्यात येते. परंतु विद्यमान अधिवेशन बोलावण्यात एवढी घाई करण्यामागे नेमके कारण काय? असा कोणता आपत्कालीन प्रसंग उद्भवला होता? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यावरून अतिशय चुकीचा असा पायंडा गोव्यात पाडला जात आहे हेही सिद्ध होत आहे.