दहा दिवसांपासून पाणी नसल्याने एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांना समज : महापालिकेत तातडीची बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाला असून सातत्याने तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांची तातडीची बैठक सोमवारी सकाळी मनपा आयुक्त कक्षात घेण्यात आली. तसेच पाणी समस्येबाबत अधिकाऱयांना धारेवर धरले. शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करा, अन्यथा झाडाला बांधून घालू असा इशारा दिला.
शहरवासियांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची स्वप्ने दाखविण्यात येत आहेत. पण सध्या चार दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून एलऍण्डटी कंपनीच्या विरोधात आरडाओरड होत आहे. उत्तर विभागातील विविध वसाहतीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उत्तर विभागातील नगरसेवकांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी सोमवारी सकाळी महापालिका कार्यालयात एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांची तातडीची बैठक आयोजित केली. यावेळी पाणी समस्या निर्माण होण्यास कोण कारणीभूत आहे? अशी विचारणा अधिकाऱयांकडे केली. तसेच सातत्याने पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत असून शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
हेस्कॉमच्या दुरुस्तीकामामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला होता. तसेच हिडकल जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली. तसेच हिंडलगा पंपहाऊसमधील पंप खराब झाल्याने दुरुस्ती करण्यात आली असून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.
टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
प्रत्येकवेळी दुरुस्तीचे कारण देण्यात येत असून शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असतानादेखील नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एलऍण्डटी कंपनीच अपयशी ठरली आहे. सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास झाडाला बांधून घालण्यात येईल, असा इशारा आमदार अनिल बेनके यांनी अधिकाऱयांना दिला. येत्या आठ दिवसांत सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत करा. तसेच बंद असलेल्या कूपनलिकांचे विद्युत पंप दुरुस्त करण्याची सूचना केली. पाणीपुरवठा होत नसलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करा आणि आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या, अशा विविध सूचना आमदार अनिल बेनके आणि मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांना दिल्या. यावेळी एलऍण्डटी कंपनीचे प्रतिनिधी सुहास कामत यांच्यासह अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
शुक्रवारी धरणे धरण्याचा इशारा
बसव कॉलनी परिसरात अकरा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे बसव कॉलनीतील रहिवाशांनीदेखील सोमवारी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आणि आमदार अनिल बेनके यांची भेट घेतली. तसेच दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. पाणीपुरवठा न केल्यास शुक्रवार दि. 31 रोजी धरणे धरून रास्तारोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.