बेळगावसह राज्यात खळबळ : मंत्र्याच्या नावाने लिहिली चिठ्ठी
वार्ताहर / हिंडलगा
पंचायतराज खात्याकडून कामाचे बिल मिळाले नसल्याने हताश होऊन हिंडलग्याच्या कंत्राटदाराने उडुपी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. संतोष के. पाटील (वय 35, रा. समर्थनगर, हिंडलगा) असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. संबंधित खात्याचे मंत्री के. ईश्वरप्पा आपल्या मृत्यूस जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 2021 साली हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध विकासकामे करण्यात आली. त्यामध्ये संतोष पाटील यांनी सुमारे 4 कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली होती. पण सदर कामाचे बिल देण्यासाठी संबंधित खात्याने टाळाटाळ केली. सातत्याने पाठपुरावा करूनही कामाचे बिल न मिळाल्याने हताश झालेल्या संतोष पाटील यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली होती. 28 मार्च रोजी केलेल्या तक्रारीत के. ईश्वरप्पा यांनी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संतोष यांच्यावर दबाव घालण्यात आला होता. त्यातूनच हताश होऊन संतोष यांनी उडुपी येथील शांभवी लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष यांनी पंतप्रधानांना पत्र पाठविल्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव घालण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्यातूनच संतोष यांनी सोमवारी उडुपी येथील शांभवी लॉजमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला आहे.
चिठ्ठीत ईश्वरप्पांचा उल्लेख
आत्महत्या करण्यापूर्वी संतोष यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये ईश्वरप्पा यांच्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. माझ्या पश्चात पत्नी व मुलांना संरक्षण द्या, त्यांची काळजी घ्या, असेही चिठ्ठीत नमूद केले आहे. पत्रकारांच्या एका ग्रुपवरदेखील ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी माझ्या कुटुंबाला मदत करावी, अशी विनंतीही या चिठ्ठीमध्ये केली आहे.
बेळगाव परिसरातून संताप
बेळगाव येथील कंत्राटदाराने बिलासाठी आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काम करायचे, पैसा गुंतवायचा आणि बिलासाठी अशाप्रकारे नाहक त्रास सहन करायचा. यामुळे या कंत्राटदाराने आपले जीवन संपविल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या असून बेळगाव परिसरातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात सरकार हस्तक्षेप करणार नाही. प्रकरणाचा संपूर्ण तपास करून सत्यासत्यता उघडकीस आणण्यात येईल. संतोष यांचा मृतदेह उडुपीतील लॉजमध्ये आढळला आहे. पोलिसांनी तेथील परिसराची पाहणी केली आहे. प्राथमिक तपासाचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– बसवराज बोम्माई, मुख्यमंत्री
प्रकरणात आपला सहभाग नाही
संतोष पाटील कोण आहे, हे आपल्याला ठाऊक नाही. त्यांच्या आत्महत्या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नाही. त्यांनी आपल्या खात्याविरुद्ध केलेल्या आरोपप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संतोष यांनी आपल्या खात्याकडून कोणतेही टेंडर मिळविलेले नाही. आरोप करणाऱयांनी हे न्यायालयात सिद्ध करणे आवश्यक होते. आपण राजीनामा देणार नाही.
– ईश्वरप्पा, ग्रामविकास-पंचायतराज मंत्री