बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के.एस. ईश्वरप्पा (k s eshwarappa) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उडुपी (Udupi) येथे एका बांधकाम कंत्राटदाराला (Construction contractor) आत्महत्येला (suicide) प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात ईश्वरप्पा यांना प्रथम क्रमांकाचे आरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या भावाने पोलिसात तक्रार दिली होती. तर ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस(congress) कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. तसेच केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी satish jarakiholi)यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान,मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (basavaraj bommai) यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले, या प्रकरणात नेमके काय घडले आहे हे जाणून गेण्यासाठी आपण स्वत: ईश्वरप्पा यांच्याशी बोलणार आहे. त्यामुळे याप्रकरणावर आपण बोलू असे ते म्हणाले.
यापूर्वी मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा मृत कंत्राटदार संतोष पाटील (santosh patil) याचा भाऊ प्रशांत पाटील (prashant patil) यांनी तक्रार केल्यांनतर मंगळवारी रात्री पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. संतोष पाटील हा मंगळवारी उडुपीतील एका लॉजमध्ये मृतावस्थेत सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. तसेच प्रशांतने त्याच्या तक्रारीत मंत्री ईश्वरप्पा, तसेच त्यांचे कर्मचारी रमेश व बसवराज यांची नावे आरोपी म्हणून घेतली आहेत.
प्रशांतने केलेल्या तक्रारीनुसार, २०२०-२१ साली लोकांनी ईश्वरप्पा यांची भेट घेऊन त्यांना गावात रस्ते बांधण्यासह इतर कामे करण्याची विनंती केली होती. ईश्वरप्पा यांनी त्यांना काम सुरू करण्यास सांगितले. यानंतर संतोष पाटीलला या कामांचे कंत्राट देण्यात आले. संतोषने गावात ४ कोटींची कामे केली. त्याने स्वत:चा पैसा या प्रकल्पात लावला आणि या कामाचे बिल थकीत होते. संतोषने अनेकदा मंत्री ईश्वरप्पा यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम जारी करण्याची विनंती केली होती. पण त्यांचे जवळचे सहकारी बसवराज व रमेश हे ४० टक्के कमिशनची मागणी करत होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका न्यायसहाय्यक पथकाने पाटील मृतावस्थेत आढळलेल्या ठिकाणाला भेट देऊन पुराव्यांची पाहणी केली.
प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
ठेकेदार आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद बुधवारी (ता. १३) दिवसभर बेळगावात उमटले. कॉंग्रेसने याविरोधात मोर्चा काढून मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंत्र्याचा सहभाग असल्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.