रात्रीच्यावेळी दुकाने बंद करण्यासाठी अरेरावीचा आरोप
प्रतिनिधी /बेळगाव
रात्रीच्यावेळी दुकाने बंद करण्यासाठी भाग पाडताना पोलीस शिवीगाळ व अरेरावी करीत आहेत, असा आरोप करीत आझमनगर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी पोलीस स्थानकाला घेराव घातला.
गुरुवारी रात्री दुकाने बंद करताना काही नागरिक व पोलीस यांच्यात वादावादीची घटना घडली आहे. त्यामुळे शुक्रवारच्या नमाजनंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घातला. उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. आम्ही नेहमी पोलीस दलाला सहकार्य करतो. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. रात्रीच्यावेळी दुकाने बंद करण्यास भाग पाडत शिवीगाळ केली जात आहे. पोलिसांनी ते थांबावावे, अशी मागणी करण्यात आली.