कोल्हापूर/प्रवीण देसाई
पावसाळा तोंडावर आला आहे. अधूनमधून वळीवाची हजेरी लागत आहे. ही पावसाची चाहूलच म्हणावी लागेल. यासह संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. सद्यस्थितीला सर्व यंत्रणांची पुरेशी व्यवस्था आहे. परंतु पूरपरिस्थितीत मदतकार्यात आणखी गतिमानता यावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला ‘रेस्क्यु व्हॅन’ची आवश्यकता आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाने नुकतीच राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे.
सध्या महापालिकेकडे अशा प्रकारची ‘रेस्क्यु व्हॅन’ आहे. त्याचा उपयोग शहरासाठी होत आहे. परंतु ग्रामीण भागातही गतिमान पद्धतीने मदतकार्य करता यावे, यासाठी अशा प्रकारच्या व्हॅनची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात गरज आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेताना, जिल्हा प्रशासनाने रेस्क्यु व्हॅनसाठी निधीची मागणी केली आहे. त्यासाठी सुमारे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
या रेस्क्यु व्हॅनमध्ये बोट, लाईफ जॅकेट, कटर, रोप, दोऱया आदी साहित्य सज्ज असते. यावर जवळपास ६आपत्ती व्यवस्थापनचे जवान बसू शकतील इतकी क्षमता आहे. आताच्या घडीला पूरपरिस्थिती किंवा एखादी दुर्घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनात साहित्य भरल्यानंतर ती रवाना होते. यामुळे थोडा वेळ लागतो. याउलट रेस्क्यु व्हॅनवर सर्व साहित्य सज्ज असल्याने, दुर्घटनेची वर्दी आल्यावर काही क्षणातच ही व्हॅन रवाना होऊ शकते. यामुळे वेळ वाचतो तसेच लवकरात लवकर जागेवर जाऊन मदतकार्य करता येते. अशा सुविधा असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रेस्क्यु व्हॅनची मागणी होत आहे.
महापुरासह अन्य आपत्तीमध्ये जलदगतीने पोहोचून मदतकार्य करण्यासाठी ‘रेस्क्यु व्हॅन’ची गरज आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अशी व्हॅन सध्या नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अशा व्हॅनसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली आहे. त्यासाठी अंदाजे एक कोटीचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
-प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी