दावोस परिषदेत भारताचे प्रतिनिधी मंडळ दाखल ः मतभेद कमी करण्यावर देणार भर
वृत्तसंस्था / दावोस
स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी दोन वर्षांच्या कालावधीनंतर आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्लूइएफ) वार्षिक परिषदेत भारताकडून जवळपास 100 व्यावसायिक आणि काही राज्यांचे मंत्री व मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला आहे. या दरम्यान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासोबतच भारताने कोरोनाशी दोन हात कसे केले याची माहिती विदेशी गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे.
यामध्ये भारताच्या प्रतिनिधीक मंडळाचे नेतृत्व हे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल करीत असून त्यांच्यासह पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी व आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हेही सहभागी झाले आहेत. सदरच्या परिषेदत भारताची भूमिका महत्वपूर्ण राहणार असून आगामी काळासाठी भारतात गुंतवणुकीचा कल वाढविण्यासाठी व्यापार व त्याच्याशी संबंधीत असणाऱया गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
डब्लूइएफ परिषदेत देशातील प्रमुख राज्यांपैकी तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यातील प्रतिनिधी हजर राहिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आंध्रचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी, महाराष्ट्रातून मंत्री आदित्य ठाकरे व तामिळनाडूचे मंत्री थंगम थेनारासुसह तेलगणाचे मंत्री के टी रामाराव हे आपल्या प्रतिनिधी मंडळासोबत सहभागी झाले आहेत.
भारताची डिजिटल क्षेत्रात मोठी झेप ःसीईओ अमिताभ कांत
भारताने डिजिटल क्षेत्रात मोठी क्रांती केली असून देश एका वेगळय़ा बदलाकडे प्रवास करत आहे. यासोबतच राजकीय मजबूत नेतृत्वामुळे झपाटय़ाने सुधारणा होत आहेत. हे बदल गुंतवणुकीस पोषक आहेत, असे सीईओ कांत यांनी म्हटले आहे. वर्ष 2023 च्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत भारत जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम करेल असा विश्वास असल्याचे निती अयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी स्पष्ट केले आहे.
देश ग्रीन हायड्रोजनमध्ये अव्वल होणार ः मंत्री हरदीप सिंह पुरी
भारत जगातील काही देशांच्या तुलनेत हरित ऊर्जेसाठी जास्त जागरुक आहे. तसेच देश ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन व अन्य पर्यायी इंधनस्रोत व उत्पादनावर भर देत आहे. देश या उत्पादनांमध्ये अव्वल स्थान प्राप्त करणार असल्याचा दावा पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केला आहे.