नावगे ग्रामस्थांची मागणी : हनुमान मूर्तीच्या उभारणीवरून गावात दोन दिवसांपासून तणाव, पोलीस प्रशासन-शांतता समितीची बैठक
वार्ताहर / किणये
नावगे गावात हनुमान मूर्तीच्या उभारणीवरून दोन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावातील एकी अबाधित राहू द्या, अशी मागणी ग्रामस्थांतून होताना दिसून येत आहे. याबाबत बुधवारी रात्री गावातील रामलिंग मंदिरात पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी गावातील एकी राखण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेच सर्वांनी सांगितले.
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील डोंगराच्या पायथ्याशी असलेले नावगे गाव बेळगाव पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात कन्नड व मराठी भाषिक गुण्यागोविंदाने राहतात.
गावच्या वेशित बुधवारी रात्री काहीजणांनी हनुमानाची मूर्ती बसविल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मराठी व कन्नड भाषिक अशा दोन संघटनांमध्ये वादंग निर्माण झाला. यामुळे बुधवारी सकाळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेशीजवळ बसविण्यात आलेली हनुमानाची मूर्ती किणये ग्रामपंचायतीचे पीडीओ व त्यांच्या सहकाऱयांनी ग्रामपंचायतीकडे नेऊन यावर आपण योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.
गावात तणाव निर्माण झाला होती. यावेळी वडगाव ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱयांनी ग्रामस्थांना समजावल्यानंतर तणावाचे वातावरण कमी झाले.
त्यानंतर बुधवारी रामलिंग मंदिरात पोलीस प्रशासन व शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी एसीपी गणपती गुडाजी, सीपीआय श्रीनिवास हंडा यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांतून मिळालेली माहिती अशी की, गावच्या वेशित काही जणांची खासगी जागा आहे. मात्र याच जागेवर एक फलक व अनधिकृत ध्वज लावण्यात आला. त्यानंतर भविष्यात त्याच ठिकाणी आणखी एक दुसरा पुतळा उभारण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या.
मात्र, संबंधित जमिनीच्या मालकांनी यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यांना न्यायही मिळाला होता.
मात्र गावात काही जणांनी तो फलक आणि ध्वज उभारला होता तेव्हापासून हे प्रकरण अधिकच चिघळले होते. आता त्याच ठिकाणी दुसरी एक मूर्ती बसविण्यात येणार असल्याची चाहूल गावातील काही तरुणांना लागली होती. त्यामुळे त्याठिकाणी त्यांनी हनुमान मूर्ती रातोरात बसविली. त्यानंतर मात्र गावात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले.
बुधवारी रात्री शांतता बैठकीत प्रमुख ग्रामस्थांनी गावच्या वेशित कोणतीही मूर्ती नको अथवा कोणताही फलक नको. कारण त्यामुळे गावातील शांतता भंग होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबतचे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिल्यास आपण ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून निर्णय घेऊ, असे पीडीओ कुडची यांनी सांगितले.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सातेरी कामती, परशराम शहापूरकर, आपुनी पाटील, मारुती हुरकाडली, मारुती हुंबरवाडी, बाळू चिगरे आदी उपस्थित होते.
गुरुवारी दिवसभरही पोलीस बंदोबस्त
गुरुवारी दिवसभरही गावच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र गावात शांततेचे वातावरण दिसून आले. ग्रामपंचायतीच्यावतीने तोडगा काढण्यात येणार असे आश्वासन दिल्यामुळे गावात शांतता निर्माण झाली असल्याची माहितीही काही जणांनी दिली.