अ.भा.हिंदू अधिवेशनातील संसदेत सूर
प्रतिनिधी /फोंडा
प्राचीन काळी अंगकोर वाट, हंपी आदी ठिकाणी भव्य मंदिरे उभी करणाऱया राजे-महाराजांनी त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले. या मंदिरांच्या माध्यमातून गोशाळा, अन्नछत्र, धर्मशाळा, शिक्षणकेंद्रे चालवून समाजाला मोलाचे साहाय्य केले जात होते. त्यामुळेच मंदिरांशी हिंदू समाज जोडलेला असे. हल्ली मंदिरांचे एवढे व्यापारीकरण झाले आहे की, ते शॉपिंग मॉल होऊ लागले आहेत. तसेच तिर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहे. हे रोखण्यासाठी मंदिरांच्या विश्वस्थांनी तसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन करावे, असा सूर रामनाथी येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनातून व्यक्त झाला.
‘मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन’ अर्थात ‘दी टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरु करण्याची सूचना ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावरील हिंदू राष्ट्र संसदेतून करण्यात आली. विविध मंदिरांचे विश्वस्त, भक्त, अधिवक्ते आणि हिंदू संघटनाचे प्रतिनिधी त्यात सहभागी झाले आहे. या संसदेचे सभापती म्हणून ओडिशा येथील अनिल धीर, उपसभापती म्हणून हिंदू जनजागृती समितीचे प्रचारक निलेश सिंगबाळ, सचिव म्हणून हिंदू जनजागृती समितीचे आनंद जाखोटिया यांनी कामकाज पाहिले.
अडीच तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हिंदूंची मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करुन ती भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत, मंदिरात तेथील कामकाजासाठी केवळ हिंदूंचीच नियुक्ती करण्यात यावी, मंदिर परिसरात मद्य, मांस यांना बंदी असावी, तसेच अन्य धर्मियांच्या प्रसारास बंदी असावी असे प्रस्ताव संमत करण्यात आले. या प्रस्तावांना बहुमताने अनुमोदन देण्यात आले.
प्रारंभी विषय मांडतांना सिंगबाळ म्हणाले, आज सरकारीकरण झालेल्या प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा गौरवपर होतांना दिसतो. त्याचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी मंदिरांचे सुव्यवस्थापन होणे फार महत्त्वाचे आहे. अमरावती येथील रामप्रिया फाऊंडेशनच्या अध्यक्षा रामप्रियाश्री अवघड म्हणाल्या, भारत देशाचा इतिहास युवकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान मुलांना, तरुणांना मंदिराशी जोडण्याची आवश्यकता आहे. सनातन संस्थेचे प्रचारक नंदकुमार जाधव यांनी, गोव्यात ज्याप्रकारे मंदिरांनी आदर्श वस्त्रसंहिता लागू केली आहे, त्याचप्रकारे देशभरातील मंदिरांमध्येही ती लागू करण्याचा मुद्दा मांडला. या वेळी अमळनेर जळगाव येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, चांदूरबाजार अमरावती येथील गजानन महाराज सेवा समितीचे ह. भ. प. मदन तिरमारे, नांदेड येथील संत पाचलेगावकर मुक्तेश्वर मंदिरांचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी ते मंदिरांचे व्यवस्थापन कशाप्रकारे करतात, यासंबंधी माहिती दिली.