महाराष्ट्रात पंढरीची वारी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीकडे कूच करते आहे. राज्यातील शिवसेना आमदारांनी संघटनेत उभी फूट पाडत सुरतेवरुन स्वारी केली आहे आणि देशात राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मु विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने हळूहळू पण निर्धाराने येणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी यशस्वी पावले टाकली आहेत. पंढरीची वारी महाराष्ट्रातील परिवर्तनाची वारी आणि भाजपाची सन 2024 साठीची लोकसभेची वारी हेच चर्चेचे विषय झाले आहेत. पावसाने दडी मारली. महागाईने कळस गाठला, कर्जबाजारी कुटुंबाने सामुदायिक आत्महत्या केली, परीक्षांचे निकाल लागले या आणि अशा अनेक घटना लोकांकडून दुर्लक्षित होत आहेत. सत्ता कुणाची, राजकारणात कोण दमदार पावले टाकतो आणि कोण कोणावर मात करतो यावरच सर्वांचे सारे लक्ष केंद्रीत झालेले आहे. श्रीमती सोनिया गांधी, राहूल गांधी यांची ईडी चौकशी सुरु आहे. हेरॉल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यावरुन गांधी कुटुंब कचाटय़ात सापडले आहे. राज्यातही अनिल परब हे मंत्रीही मनी लॉड्रींग प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. सत्ता ही लोकसेवेसाठी असते आणि लोकप्रतिनिधी हे जनतेच्या कल्याणासाठी निवडून दिले जातात. त्यांनी आपली, नातेवाईकांची आणि आपआपल्या जातीची घरे भरायची नसतात. लोककल्याण, देशकल्याण, सामाजिक एकता, अखंडता, न्याय, सद्भाव यासाठी कामे करायचे असते. पण यांचे भान हळूहळू सुटू लागले आहे. भूक वाढते आहे आणि भ्रष्टाचार बोकाळतो आहे. जात, धर्म, कटुता वाढते आहे. भागवत धर्मात भेदाभेद अमंगळ असे म्हटले आहे आणि त्यासाठी वारकरी समतेची पताका उंचावत विठुनामाचा गजर करत पंढरीची वारी करतात. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीची वारी करतात. यंदा दोन वर्षाच्या खंडानंतर आषाढी यात्रा व वारी होते आहे. कोरोना काळात खंड पडला होता. पण आता नव्या उत्साहात अधिक उत्कटतेने वारीचे नियोजन, आयोजन करण्यात आले असून विठ्ठल..विठ्ठल गजर सुरु झाला आहे. महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या राज्यातून वैष्णवांची पावले पंढरपूरकडे कूच करत आहेत. आषाढीला पंढरीच्या विठुरायाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची अशी प्रथा आहे. यंदा ही पूजा कोण करतो हा पंढरीसह राज्यात उत्सुकतेचा विषय आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत सत्तारुढ महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आहे. याचे दर्शन झाले होते. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले त्याचवेळी महाविकास आघाडीतील खदखद स्पष्ट झाली होती. विधानपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षिले गेले. जोडीला मतदानाच्या वेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या केबीनमध्ये येवू दिले नाही ही शेवटची काडी ठरली आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्या बंडाला इतका मोठा पाठिंबा मिळाला की आपलाच गट ही खरी शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना म्हणण्यापर्यंत शिंदेंनी उचल खाल्ली आहे. अर्थात यामागे भाजपाची ताकद असणार हे उघड आहे. तथापि भाजप आपण त्या गावचेच नाही ‘वेट आणि वॉच’ असे सेंग घेऊन वावरत आहे. हे होणारच हेते. राज्यातील जनतेने भाजपा सेनेला जनादेश दिला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपा-सेनेतील कटूता लक्षात घेऊन नवा महाविकास आघाडीचा प्रयोग केला व शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार राज्यात सत्तारुढ झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान कोरोनाची महामारी आली आणि मुख्यमंत्री वर्कफ्रॉम होम करु लागले. सरकारमधील मंत्री व सरकार वसुली सरकार या आरोपाखाली भरडले गेले. नवाब मलिक तर तुरुंगातून मंत्रीपद सांभाळू लागले. गावागावातील शिवसैनिकांना सत्ता आली याचा आनंद झाला. पण कामे होत नव्हती. काही मंडळी तोडपाणी उद्योगात चारचाकी गाडय़ाची धनी झाली, बाळासाहेबांचा दरारा, विचार आणि हिंदुत्व यावरुन संघटनेत असंतोष दिसत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री निधी पळवत होते. संघटना मजबूत करत होते व शिवसेना व शिवसैनिक यांना डावलले जाते. अशी भावना बळावत होती, तक्रारी होत होत्या. पक्षप्रमुखांना सांगितले जात होते पण सुधारणा होत नव्हती. या साऱयाचा स्फोट विधानपरिषद निवडणुकी दरम्यान झाला. शिवसेनेचे आमदार मतदानानंतर उघडपणे शड्डू मारुन सुरतला गेले. काँग्रेसमध्येही हाच असंतोष आहे पण तो व्यक्त झालेला नाही. भाजपाचे शतप्रतिशत भाजप हे धोरण आहे. त्यांनी अनेकवेळा ‘ऑपरेशन कमळ’ योजना राबवून विरोधकांना नामोहरम केले आहे. भाजपाच्या लिस्टवर आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पडणार असे स्पष्ट संकेत आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत 45 आमदार आहेत असे म्हणत आहेत. त्यांनी सुरतमधील हॉटेलमधून आमदारांचे छायाचित्र पाठवले आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडा आणि बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा गर्व से कहो हा विचार पुढे न्या असे म्हटले आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. कायदेशीर स्वतंत्र गट करावा असे संख्याबळ शिंदे यांनी मिळवले असे म्हटले जात आहे. आता पुढील दोन दिवसात राजकीय घडामोडींना वेग येईल. आणखी काही पडझड, आरोप-प्रत्यारोप होतील. राष्ट्रपती राजवट व विधानसभा बरखास्तीची शक्यताही काहीजण व्यक्त करत आहेत. पण तसे वाटत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवारही वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. सत्ता राखण्यासाठी ते पावसात भिजायला कमी पडणार नाहीत. मोदी-शहा जोडी काय करते हे बघायचे. पण देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो हे सिद्ध करण्यासाठी पावले उचलली आहेत. पंढरीची वारी समता, समरसतेची पताका उंचावत आहे. यंदा विठ्ठलाची महापूजा कोण करणार ही उत्सुकता आहे. आगामी दोन दिवस महत्वाचे आहेत. उद्धव ठाकरे राजीनामा देतील हे ही स्पष्ट आहे. भाजपच्या निर्णयावरच राष्ट्रपती राजवट की भाजप-शिंदेगट सरकार हा निर्णय अवलंबून आहे. लोकांना प्रचंड उत्कंठा आहे. एकमात्र स्पष्ट आहे महाआघाडीचा पवारांचा प्रयोग शिवसेनेच्या मुळावर उठला आहे.
Previous Articleभारताचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर लँकेशायरशी करारबद्ध
Next Article भारतीय महिलांचा अमेरिकेवर विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.