राजेश क्षीरसागर यांची स्पष्टोक्ती; पुढे अजून बरंच काही घडणार असल्याचे सूचक वक्तव्य
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरची अगामी महापालिका निवडणुक भाजप आणि शिंदेगट एकत्र लढणार असल्याची स्पष्टोक्ती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. तसेच शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचाही मुख्यंमत्री शिंदे यांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पुढं अजून बरंच काही घडणार असल्याचे सूचक वक्तव्यही यावेळी क्षीरसागर यांनी केले.
अधिक वाचा- महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कामाला लागा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
राज्यातील 15 दिवसांच्या सत्तांतर नाट्य़ानंतर गुरुवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, याप्रसंगी ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, बहुमत सिद्ध करताना शिवसेना आमदारांनी केलेल्या भाषणामधून त्यांची नाराजीचे कारण सर्वांना समजले. आमदार बाहेर पडल्यानंतर एका शिवसेना नेत्याबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली. मात्र एखाद्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी आमदारांच्या नाराजीकडे पक्षप्रमुखांनी लक्षण देणे गरजेचं होत. शिवसेनत दहा, बारा वर्षांनी बंड होतो. आत्तापर्यंतच्या बंडापेक्षा सध्या मोठय़ाप्रमाणात आमदार बाहेर पडले. हे आमदार बाहेर का पडले याचा विचार नेतृत्त्वाने करावा, असे क्षीरसागर म्हणाले.
चंद्रकांतदादा आमचे नेते, महत्त्वाची जबाबदारी मिळेल
राजकारणात कधीही कोणी कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. नवीन शिंदे सरकारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील आमचे नेते आहेत. या सरकारमध्ये महात्त्वाची जबाबदारी मिळेल अशी आशा आहे. जबाबदारी मिळाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापुरच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार
राज्यात मराठा आणि ओबीस आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. पुढील काळात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ते नक्कीच मार्गी लावतील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
मातोश्रीवर काहीही बोलणार नाही
मातोश्री हे आमचे मंदीर आहे. या मंदिराला तडा देण्याचे कटकारस्थान काहींनी आखले आहे. पराभूत होऊनही उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे पद दिले. पर्यावरण, पर्यटनमधून आदित्य ठाकरे यांनी भरघोस निधी दिला. त्यांच्याबाबत नेहमीच आदर असणार आहे. मातोश्रीने भरभरुन दिले आहे. मात्र विकासाच्या व्हिजनसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. पण मातोश्रीवर कधीही काहीही बोलणार नसल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
पदाधिकाऱ्यांच्या लवकरच निवडी जाहीर
जयवंत हारुगले, शिवाजीराव जाधव यांना पदावरुन हटविण्यात आले. नुतन निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी स्पष्ट केले.