धबधबा परिसरात हुल्लडबाजी, पोलिसांना आणखी एक बंदोबस्त.
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी/ सुधाकर काशीद
कोल्हापूर: कोसळणारा धबधबा नक्कीच सर्वांना आकर्षित करतो. पण त्यामुळे काही जणांच्या उसळणाऱ्या अति उत्साहामुळे धबधबा परिसराला हुल्लडबाजीचे स्वरूप आले आहे. पूर्वी धबधबा त्याच्या दूरवरून येणाऱ्या पाण्याच्या लोटाच्या धीरगंभीर आवाजावरून कळत होता. आता डोंगरदऱ्यात जेथे जल्लोष, जेथे चित्कार, जेथे गर्दीचे लोट, वाहनाच्या रांगा व खाण्यापिण्याची सोय तेथे नक्की धबधबा…ही त्याच्या ओळखीची खूण झाली आहे. धबधब्याचा खरोखर आनंद घ्यायला आलेल्यांनी धबधब्याखाली जागा मिळाली तर अंग चोरून उभे राहायचे व केवळ हुल्लडबाजी करायला आलेल्यांनी साऱ्या धबधबा परिसराचा ताबा घ्यायचा, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंबोली, बर्की, राऊतवाडी, हसणे, माऊली कुंड, रामणवाडी, तोरस्करवाडी, कासारवाडी कावळटेक, चंदगड येथील धबधब्यांच्या ठिकाणी आता जत्रेचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात या कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घ्यायचा नाही तर मग कधी घ्यायचा.., हे खरे आहे. पण काही जणांचा अतिउत्साह धबधब्याच्या निसर्ग सौंदर्याला नक्कीच बाधा आणू लागला आहे.
धबधब्याचा आनंद घ्यायला येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांना चहा, नाश्ता, जेवण, इतर खाद्यपदार्थ, पार्किंग असे तात्पुरत्या स्वरूपाचे व्यवसाय नक्की मिळाले आहेत. पण हुल्लडबाजी व अती उत्साहामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांत रोज वाद ठरलेला आहे. इतर दिवशी दोन-तीन पोलीस व शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी दहा-बारा पोलीस बंदोबस्तासाठी आता स्थानिक प्रशासनाला नेमावे लागत आहेत.
हेही वाचा- राधानगरी धरण 60 टक्के भरले,1400 क्यूसेकने विसर्ग सुरू
जिह्याच्या पश्चिम भागाला निसर्गाचे मोठे वरदान आहे. तेथे जंगल, डोंगरदऱ्या, झिम्माड पाऊस, वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. डोंगराळ प्रदेश व पाऊस यामुळे उतारावरून खळाळते पाणी सतत वाहत असते. त्याचे रूपांतर एखाद्या ठिकाणी मोठय़ा धबधब्यात होते. हे धबधबे शेकडो नव्हे, हजारो वर्षापासूनचे आहेत, त्याची माहिती फक्त त्या त्या भागातील लोकांनाच होती. ‘कड्याकडेचे पाणी’ असे स्थानिक भाषेत धबधब्यांची ओळख होती. त्याच्या कोसळणाऱ्या पाण्याच्या लोटांचा धीरगंभीर आवाज नेहमी गूढ निर्माण करत होता. त्यामुळे स्थानिक लोकही काही विचित्र समजुतीमुळे या धबधब्यांकडे जाणे टाळत असायचे. आमावस्येला तेथे नैवैद्य टाकले जात होते.
हेही वाचा- Kolhapur; धामणी नदीवरील आंबर्डे- वेतवडे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली
पण अलीकडच्या काही वर्षांत पावसाळी पर्यटनाची क्रेझ वाढली व या धबधब्यांच्या ठिकाणांना नवी ओळख मिळाली. सोशल मीडियामुळे तर नव्या नव्या #ब्यांची, त्याकडे जाणाऱ्या मार्गांची माहिती मिळत गेली. पावसाळी पर्यटन म्हणजे धबधबा अशीच ओळख निर्माण झाली. एकावेळी शेकडो लोक धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद घेऊ लागले. काही अतिउत्साही धबधब्याच्या धारेखाली न उभारता दगड चढून धबधब्याच्या मुख्य प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे दगड कोसळू लागले. हे अति उत्साही देखील दगडावरून कोसळू लागले. धबधब्याखाली जायचे म्हणजे मद्यप्राशन हे जणू काही ठरुनच गेले व तेथूनच सारे बिघडत गेले. धबधब्याच्या पाण्याच्या धारेत दारूचा ग्लास भरायचा, हे तर कॉमन झाले. परिणामी, गोंधळ वाढला. धबधब्याचा आनंद घ्यायला महिला, अनेक कुटुंब उत्सव लोक देखील आले आहेत हे विसरून हुल्लडबाजी सुरू आहे.
आता बहुतेक धबधब्यावर पार्किंगला जागा नाही.., अशी धबधबा परिसरांची परिस्थिती आहे. रस्त्यावर मद्य प्राशन करणारे टवाळखोर आहेत. स्थानिक लोकांची वाद करण्यात काहींना शौर्य वाटते आहे. परिणामी धबधबे अति उत्साही मंडळींच्या या क्षणी ताब्यात गेले आहेत.