विरोधकांकडून ‘गोंयाक कोळसो नाका’ घोषणा : घोषणा देण्यात सत्ताधाऱयांनी दिली साथ,विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात कोळसा नको, त्यावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱया आमदार विजय सरदेसाई व आमदार एल्टन डिकॉस्ता यांचा खासगी ठराव मतविभागणी न करताच आवाजी मतदानाने संमत केल्यामुळे या दोन्ही आमदारांसह विरोधकांनी दोन वेळा गदारोळ घातला. त्यामुळे सभापती रमेश तवडकर यांना कामकाज तहकूब करावे लागल्याने त्यांनी विधानसभेचे पुढील कामकाज सोमवार सकाळी 11.30 वाजपर्यंत तहकूब केले. यावेळी विरोधकांबरोबरच काही सत्ताधारी आमदारही ‘गोंयाक कोळसो नाका’ अशा घोषणा देत असल्याचा विरोधाभास दिसून आला.
काल शुक्रवारी आपला हा खासगी ठराव मांडताना सरदेसाई म्हणाले की तमनार वीजप्रकल्प, रेल्वे दुपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण हे तिन्ही प्रकल्प केवळ कोळशाची वाहतूक करण्यासाठी होत असून गोव्याला या प्रकल्पांची गरज नाही. त्यामुळे हे प्रकल्प रद्द करावे. तसेच रेल्वे दुपदरीकरणाला नकार दर्शवीत जी आंदोलने झाली त्या आंदोलनाच्या दरम्यान ज्यांच्यावर तक्रारी नोंद करण्यात आल्या, त्या मागे घेण्यात याव्यात असा खाजगी ठराव आमदार विजय सरदेसाई आणि आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी मांडला होता.
गोव्याला कोळसा हब करण्याचा प्रयत्न
राज्यात कोळशाची वाहतूक वाढली असून दक्षिण गोव्यातील लोकांवर याचा प्रचंड प्रमाणात परिणाम झाला आहे. कोळशाचा गोव्याला फायदा नाही, मात्र धनाढय़ लोकांचे हित जपण्यासाठी गोवा कोळशाचे हब करण्यात आले आहे. गेव्यात होणारे उपरोल्लेखित तीनही प्रकल्प हे कोळशाची वाहतूक करण्यासाठीच असून सागरमाला जेटीवरूनही कोळशाची वाहतूक होत आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
न्यायालयाच्या आदेशानंतरही घाई का?
या तिन्ही प्रकल्पाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर गेले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने सीईसी समिती नियुक्त करून अहवाल मागितला होता. त्या अहवालाच्या आधारे तिन्ही प्रकल्पांची गरज नसल्याने तुर्तास रेल्वे दुपदरीकरणाचे काम, ज्या ठिकाणी पर्यावरणाची हानी होते ते बंद ठेवावे असे म्हटले आहे. असे असतानाही सरकारला हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची घाई का होत आहे, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.
पर्यावरण राहिले नाही, तर पर्यटक का येणार?
या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. ज्या पर्यावरणाच्या आकर्षणाने पर्यटक गोव्यात येतात ते पर्यटकही गोव्यात येणार नाहीत. पर्यटन व्यवसाय हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय असून एका बाजूने पर्यटन व्यवसायाला चालना देणार असे सरकार सांगत आहे, तर दुसऱया बाजूने पर्यावरण नष्ट करून कोळशाची वाहतूक वाढवून प्रदुषण वाढवत आहे. मुरगाव, वास्को भागात जळस्थळी हाताला कोळसा लगतो. कालंतराने या कोळशामुळे कर्क रोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे तिन्ही प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
विकास प्रकल्प ही गोव्याची गरज : पर्यावरणमंत्री
सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेऊनच सरकार काम करीत आहे. न्यायालयाने प्रकल्प रद्द करा असे म्हटलेले नाही तर काही ठिकाणाचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सरकारने ते काम बंद ठेवून पुढील काम सुरु ठेवलेले आहे. गोव्याचा विकास आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. कालांतराने कोकण रेल्वेचेही दुपदरीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ती गोव्याची गरज आहे. त्यामुळे विजय सरदेसाई व एल्टन डिकॉस्ता यांनी मांडलेला खाजगी ठराव मागे घ्यावा, असे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.
आमदार विजय सरदेसाई यांनी ठराव मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे तो मतदानास घालण्याचे ठरले. विजय सरदेसाई यांनी मतविभागणी घेण्याची मागणी केली. त्यांचे ऐकून न घेता आवाजी मतदान करून ठराव फेटाळण्यात आला. त्यानंतर चहापानासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. चहापान झाल्यानंतर पाच वाजता कामकाज सुरु झाले तेव्हा विरोधकांनी पुन्हा मतविभागणी घेण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे गदारोळ सुरु झाला. आमदार विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्ता यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या टेबलाकडे धाव घेतली. त्यांच्या मागोमाग इतर विरोधी आमदारही गेले. घोषणा देण्यास सुरुवात केली. गोव्यात कोळसो नाका अशा घोषणा विरोधी आमदार देत असताना सत्ताधारी पक्षातीलही काही आमदार गोव्यात कोळसो नाका अशा घोषणा देत होते.