कुडचडेत प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जनसुनावणी : अनेकांकडून प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित, उपक्रम डोळय़ांना पाणी लावण्यासाठी असल्याचीही टीका
प्रतिनिधी /कुडचडे
सांगे तालुक्यातील सांतोण गावात गोवा स्पाँज अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सुरु असलेल्या कारखान्याचा विस्तार करण्यासाठी सरकार दरबारी प्रस्ताव मांडण्यात आला असून यासंदर्भात लोकांचे मत ऐकून घेण्यासाठी कुडचडे रवींद्र भावनात मंगळवारी सार्वजनिक सुनावणी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने झाली. व्यासपीठावर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी जोती कुमारी व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिव शर्मिला मोन्तेरो यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी कारखान्यामुळे होणाऱया प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला तसेच कंपनीवर आणि मंडळावरही आरोप केले.
एकूण 36 लोकांनी प्रकल्पाचा विस्तार व्हावा की होऊ नये यावर मत व्यक्त केले. सदर सुनावणीच्या वेळी गोवा स्पाँज कंपनीकडून कशा प्रकारे लोकांवर अन्याय करण्यात येतो त्यासंबंधी दावे करण्यात आले. ही जनसुनावणी वातानुकूलित सभागृहात घेण्याऐवजी प्रत्यक्ष ज्या भागात कारखाना सुरू आहे तेथे घेऊन सदर कारखान्यामुळे सांतोण गावात प्रभावित होणाऱया लोकांची मते जाणून घेण्याची गरज होती. यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष घालावे, अशी मागणी प्रदीप काकोडकर व इतरांनी केली.
परवानगी न देण्याची मागणी
गावात राहणारे लोक साधेभोळे असल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक शिक्षित व कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती घेते. गेले चाळीस वर्षे आपण प्रतिदिन 40 रुपये पगारावर काम केले. ज्यावेळेस आपण कारखान्यातून होणाऱया प्रदूषणावर आवाज उठविला तेव्हा आपल्याला कामावरून काढण्यात आले. हे सर्व कंपनीच्या अधिकाऱयांनी केलेले नसून कंपनीद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या विश्वास सावंत यांनी केले आहे, असा आरोप स्थानिक नागरिक प्रीती देसाई यांनी यावेळी केला. अशा प्रकारे सामान्य व गरीब लोकांना सताविणाऱया कारखान्याच्या विस्ताराला अजिबात परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.
मंडळ व कंपनीचे साटेलोटे असल्याचा आरोप
गेल्या कित्येक वर्षांपासून गोवा स्पाँजचा कारखाना सुरू आहे व कित्येक वेळा या कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाचा प्रश्न पुढे आलेला आहे. पण त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकदा सुद्धा जाहीर बैठक किंवा अशा प्रकारची जनसुनावणी बोलावली नाही. मात्र कारखान्याच्या विस्ताराचा प्रश्न आल्यावर त्याला सांतोण गाव मान्यता देणार नाही याची जाणीव असल्यामुळे हे पाऊल टाकण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा स्पाँज यांच्यात साटेलोटे असल्याचे यातून स्पष्ट दिसून येते, असा गंभीर आरोप कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघातील लोकांनी यावेळी केला.
डोळय़ांना पाणी लावण्यासाठी जनसुनावणी
केवळ जनतेच्या डोळ्य़ांना पाणी लावण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही जनसुनावणी घेतली आहे. कारण कारखान्याच्या पुढे होणार असलेल्या विस्ताराचा आराखडा जनसुनावणी होऊन परवानगी मिळवण्यापूर्वीच तयार झालेला आहे, असा दावा सांतोण, आंबेउदक व इतर भागांतील ग्रामस्थांनी केला. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणत्या स्तरावर काम करत आहे याविषयी शंका येते. कारण सर्वेक्षण न करताच कारखान्याच्या विस्ताराला परवाना देण्याचा अर्थ काय, असा सवाल त्यांनी केला. यावेळी लोकांनी विचारलेल्या काही प्रश्नांना उत्तरे देण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अपयशी ठरले.
शेल्डेचे प्रशांत गावस देसाई म्हणाले की, कोणत्याही नवीन प्रकल्पाची उभारणी होत असेल, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक आहे. पण त्याचबरोबर संबंधित पालिका वा पंचायतीच्या व्यतिरिक्त जैवविविधता मंडळाच्या अनुमतीचीही गरज असते. आज प्रत्येक पंचायतीत जैवविविधता समिती कार्यान्वित आहे. पण त्यांची अनुमती घेण्याचा प्रकार होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
निसर्ग सांभाळून पाऊल टाका
कारखान्याचा विस्तार करण्यास कोणताच आक्षेप नाही. पण फक्त चार लोकांना कामावर घेऊन बाकीच्या लोकांना प्रदूषणाची बाधा सहन करायला लावणे हे उचित आहे का. निसर्गाचा नाश करून फक्त काम मिळाल्याने व त्यातून पैसे मिळाल्याने खाण्यासाठी लागणारे पौष्टिक खाद्य मिळणार का. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी तसेच कंपनीच्या मालकांनी व अधिकाऱयांनीही विचार करणे गरजेचे असून निसर्ग सांभाळून व येणाऱया पिढीची काळजी घेऊन पाऊल टाकावे, असे मत काहींनी मत व्यक्त केले.
आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका उपलब्ध करावी
यावेळी युवा प्रतिनिधांनी सदर कारखान्याच्या विस्ताराला विरोध दर्शविताना प्रदूषण नियंत्रण मंडळ बरोबर काम करत नसल्याचा आरोप केला. सदर विस्तार करायचा असल्यास कंपनीने आजपर्यंत प्रदूषण सोसत आलेल्या स्थानिक लोकांसाठी एक आरोग्य तपासणी केंद्र तसेच 24 तास एक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर बिगरगोमंतकीयांपेक्षा येथील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती कामावर रूजू करून घ्यावी. तसेच येथील लोकांचा आरोग्य विमा उतरविण्यावर भर द्यावा, अशा मागण्या त्यांनी समोर ठेवल्या.
शेकडो लोक जनसुनावणीस वंचित
प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणीस हजर राहण्यासाठी दैनिकांतून व विविध ठिकाणी फलक लावून आवाहन केले होते. पण सदर जनसुनावणी कामाच्या दिवशी ठेवल्याने शेकडो लोकांना त्यात सहभागी होता आले नाही असे सभागृहातील उपस्थितीवरून दिसून आले. कारण या कारखान्याच्या प्रभावाच्या क्षेत्राशी निगडीत केपे, सांगे, धारबांदोडा, सासष्टी या तालुक्यांतील कुळे, किर्लपाल, दाभाळ, धारबांदोडा, मोले, साकोर्डा, मळकर्णे, असोल्डा, आंबेली, अवेडे, कोठंबी, चौफी, बाळ्ळी, अडणे, चांदर, कावोरे, कुडतरी, गिरदोली, माकाझान, राशोल, रुमडामळ-दवर्ली, सारझोरा, सां जुझे दि आरियाल, सावर्डे, कुडचडे, उगे, शेल्डे, काले, भाटी, रिवण, पंचवाडी, बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार, बोरी व शिरोडा या भागातील लोकांसाठी ही जनसुनावणी होती. पण त्या प्रमाणात लोकांची उपस्थिती नव्हती, अशी माहिती जनसुनावणीत उपस्थित लोकांनी दिली व त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली जनसुनावणी दुपारी दीडला संपली.