ऐन पावसाळ्यात माणगंगा नदी कोरडी
प्रतिनिधी/म्हसवड
ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील एका बाजूला पावसाचे आगर तर दुसऱया बाजूला कायम दुष्काळी असे विदारक चित्र सातारा जिल्ह्यात पहावयास मिळते. गेले आठ दिवस महाराष्ट्रात पडत असलेला मुसळधार पावसामुळे दुष्काळी माण खटाव सोडून अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ओढे, नाले, बंधारे वाहत आहेत. तसेच पश्चिम भागातील अनेक गावातील नागरिक स्थलांतरित झाले. तरी माण तालुक्यातील दहा महिने कोरडी असलेली माणगंगा नदीमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी सोडण्याची मागणी माणमधून होत आहे.
सातारा जिल्हय़ातील सातारा, महाबळेश्वर, पाटण जावळी आदी ठिकाण सर्वात जास्त म्हणजे संपूर्ण सातारा जिह्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा या भागात पाऊस पडत असतो. या दहा दिवसात तर 441 मिमी एवढा मुसळधार पाऊस पडल्याने सातारा जिह्यातील काही ठिकाणी पूरपरिस्थीती निर्माण होऊन अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र माण तालुक्यातील एकमेव असलेली एकमेव माणगंगा नदी अद्याप कोरडी ठणठणीत असून जिल्ह्यात पश्चिम भागात संततधार सुरू आहे. दुष्काळी माणला वरुणराजाने वंचित ठेवला आहे. दोन वेळा पेरणी बळीराजाने केली तरी अजून जमिनीतून कोंबही बाहेर आले नाहीत. माणमधील अनेक आंधळी, पिंगळी मासाळवाडी, रांणद, ढाकणी आदी तलावात मृत साठा ऐन पावसाळ्यात शिल्लक राहिलेला आहे. बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. ओढे नदी पावसाळ्यात कोरडी आहे, अशी दयनीय परिस्थीतीत दुष्काळी माणदेशी बळीराजाची आहे.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाचा सन्मान
दरवर्षी पुराचे वाहून जाणारे पाणी माण, खटावला सोडण्याची मागणी होत आहे. परंतु याकडे कोणताही अधिकारी व मंत्री, आमदार, खासदार कोणीच लक्ष देत नाही. यावर्षी हजारो क्युसेक पावसाचे पाणी वाहून गेले तेच वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला पाटाने दिल्यास या भागातील शेतकरी राजाला दिलासा मिळणार आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पडलेल्या पावसाचे वाहुन जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळवून माणदेशी माणसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून हे पाणी माणगंगा नदीत सोडून दुष्काळी भागाला दिलासा द्यावा, अशी मागणी माणमधील बळीराजा करत आहे.