कोल्हापूर -अन्न, वस्त्र, निवारा यासोबतीने वीज ही चौथी तर संदेशवहनाचे बँडविड्थ ही पाचवी गरज बनते आहे. ऊर्जा महोत्सवाच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्राचे सिंहावलोकन करीत असताना पुढील २०४७ अर्थात २५ वर्षाचे नियोजन केले जाते आहे. पर्यावरण संतुलन साधून उर्जेची गरज भागविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अपारंपारिक उर्जेचा प्रवास गतिमानतेने सुरु असल्याबाबत कुलगुरू.डॉ.डी.टी.शिर्के यांनी समाधान व्यक्त केले. अपारंपारिक उर्जा निर्मितीचे २०३० पर्यंतचे ५०० गिगावॅट उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.
आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सव सुरू आहे. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या . २५ ते ३० जुलै २०२२ या कालावधीत हा महोत्सव साजरा करण्यात येतो आहे.कोल्हापुरात भारतरत्न डॉ.एस.विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल येथे उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य महोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहूल रेखावार (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण (भाप्रसे),मुख्य अभियंता.परेश भागवत, नोडल अधिकारी तथा अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, अधिक्षक अभियंता मनोज विश्वासे, एनटीपीसी लि. चे डी.सुरेश, जि. के.विवेक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
वीज डिजिटल युगाचा पाया- जिल्हाधिकारी
वीजेच्या अविरतपणावर अर्थचक्राचा व नागरीकांचा सर्वांगिण विकास अवलंबून आहे. वीज आता मानवतेची गरज झाली आहे. पुढील काळात विजेचा समावेश मानवी हक्कात होईल, अशी स्थिती आहे. विजेच्या उपलब्धतेवर उद्योग क्षेत्राची घोडदौड, देशाच्या प्रगतीचा आलेख अवलंबून आहे. तेंव्हा उद्योगांना अखंडीत वीज दिली पाहीजे. वीज क्षेत्रासह या क्षेत्राला पूरक घटकातील संशोधन कार्यामुळे आज देशात अमुलाग्र बदल झाले आहेत. एक देश एक ग्रीडमुळे देशात विजेची उपलब्धता व वहन सोपे झाले आहे. देशाच्या विकासासाठी ऊर्जा क्षेत्राचा विकास महत्वाचा आहे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे अवतरलेल्या डिजिटल युगास वीज ही एक पायाभूत घटक असल्याचे मत जिल्हाधिकारी मा.श्री. राहूल रेखावार (भाप्रसे) यांनी व्यक्त केले. नागरिकांना वीज बिल भरणे, तक्रार निवारण, नवीन वीज जोडणीसाठी उपलब्ध असलेल्या महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा विशेष उल्लेख त्यांनी केला. विजेचे वीज बील वेळेत भरले पाहिजे असेही त्यांनी सांगितले