नागरिक हैराण, कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्टसिटी योजनेतील विविध रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. काही रस्त्याचे काम अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एसपीएम रोडवरील रस्त्याचे काम अर्धवट असतानाच आता याठिकाणी ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. येथील घालण्यात आलेले पेव्हर्स हटविण्यात आल्याने रस्ता खराब झाला असून खोदण्यात आलेल्या चरीमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. येथील चरी कधी बुजवणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
एसपीएम रोडचे काम तीन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. कोणती ना कोणती कामे शिल्लक असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपूल ते शिवाजी उद्यानापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. पण सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम व्यवस्थित झाले नाही. अशातच रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर्स घालण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलानजीक रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अडचणीचे बनले होते त्यामुळे याठिकाणी काही भागाचे पेव्हर्स घालून रस्ता व्यवस्थित करण्यात आला होता.
पण काही ठिकाणी डेनेज वाहिन्यांची समस्या निर्माण झाल्याने रस्ता खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. एसपीएम रोडच्या शेजारी डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. चार महिने उलटले तरी अद्याप चर बुजविण्यात आले नाही.
याठिकाणी खोदण्यात आलेल्या चरींमुळे वाहनधारक आणि व्यावसायिकांना अडचण निर्माण झाली आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने व्यावसायिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गणेशोत्सव जवळ आला असून याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती पुजविला जातो. पण अद्याप येथील चरी बुजविण्यात आल्या नसल्याने येथील चरी कधी बुजवणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहेत. खोदण्यात आलेल्या ठिकाणी डेनेज वाहिन्या घालून रस्ता व्यवस्थित करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.