गुहागर-झोंबडीतील घटना, -वाद झाल्याने स्पर्धा अर्ध्यावर रद्द
प्रतिनिधी / गुहागर
तालुक्यातील झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भातलावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेसाठी परवानगी घेतलेली नसल्याने गुहागर पोलिसांनी आयोजक समीर तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची तक्रार मनोहर दत्ताराम चाळके (सती-चिंचघरी, ता. चिपळूण) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. शुक्रवारी झोंबडी येथे काळभैरव ग्रामस्थ मंडळातर्फे भातलावणी व नांगरणी स्पर्धेचे आयोजन समीर तावडे यांनी केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला होता. सुमारे 50 बैलजोडय़ा घेवून शेतकरी या स्पर्धेसाठी झोंबडीमध्ये उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान सहभागावरुन स्पर्धकांमध्येच वादावादी झाली. त्यामुळे ही स्पर्धा कोणत्याही निर्णयाविना अर्ध्यावरच रद्द करावी लागली.
दरम्यान, स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या मनोहर चाळके यांनी आयोजक समीर तावडे यांच्याकडे नांगरणी स्पर्धेसाठी शासनाची परवानगी घेतली आहे का, याची चौकशी केली. मात्र ही परवानगी घेतलेली नसल्याने चाळके यांनी चिपळूण पोलीस स्थानकात संपर्क केला. त्यानंतर चिपळूणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हे घटनास्थळ गुहागर पोलीस कार्यक्षेत्रात येत असल्याने मनोहर चाळकेंना सोबत घेवून चिपळूण पोलीस गुहागर पोलीस ठाण्यात आले. तेथे चाळके यांनी तक्रार दिली.
या तक्रारीत चाळके यांनी म्हटले आहे की, शासनाची परवानगी न घेता व मनाई आदेश असताना नांगरणी स्पर्धेचे आयोजन तावडे यांनी केले. याद्वारे बैलांना नांगरासह चिखलात त्रास होईल, अशा पध्दतीने पळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले होते. या मैदानात बैलांना नांगराला जुंपून यातना व वेदना होतील, अशा पध्दतीने पळविण्यात आले. यामुळे समीर तावडे व इतरांविरुध्द मी तक्रार करत आहे. या तक्रारीनंतर प्राण्यांना निर्दयतेने वागवणे प्रतिबंधात्मक अधिनियमाखाली समीर तावडेंवर गुहागर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.