ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात सोमवारी भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या एक दिवस आधी स्वातंत्र्यावेळी झालेल्या देशाच्या फाळणीवरून भाजपने पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने भारत-पाकिस्तान फाळणीसंदर्भातला एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. भाजपने काँग्रेसवर निशाणा साधताना १९४७ मधील घटनांवर आधारीत हा व्हिडीओ तयार केला आहे. जवळपास ७ मिनिटांच्या या व्हिडीओत भारताच्या फाळणीला नेहरूच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तर मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वातील मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीची मागणी केल्यानंतर त्यासमोर नेहरू झुकल्याने त्यांना जबाबदार ठरवलं आहे.
तर या व्हिडीओवर आक्षेप घेत काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. क्लेशदायक ऐतिहासिक घटनांच्या स्मृतींचा दिवस पाळून याद्वारे सध्या सुरू असलेल्या राजकीय लढायांना खतपाणी घालण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा हेतू असल्याचा पलटवार काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केला आहे. आधुनिक काळातील सावरकर आणि जिन्ना देशाची फाळणी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही रमेश यांनी केली आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्टला घोषणा केली होती की, १९४७ मध्ये फाळणीवेळी भारतीयांच्या त्रासाची आणि बलिदानाची आठवण देशाला करून देण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्टला “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” पाळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळीसुद्धा याबाबत ट्विट केलं आहे.
भाजपच्या व्हिडीओमध्ये सिरील जॉन रॅडक्लिफ यांना दाखवलं आहे. त्यांच्याच नकाशाने पंजाब आणि बंगाल अर्धे अर्धे विभागले गेले. ज्या व्यक्तीला भारतीय संस्कृतीच्या वारशाबद्दल काही माहिती नाही त्यानं केवळं काही आठवड्यात भारताच्या फाळणीची परवानगी कशी दिली गेली असा सवालही उपस्थित केला गेला. पूर्ण व्हिडीओत नेहरूंची दृश्ये दाखवण्यात आली असून व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून फाळणीबाबत सांगण्यात आलं आहे.