आजपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवास प्रारंभ होतो आहे. कोरोनाचा अडचणीचा, संघर्षाचा आणि कोंडमारा करणारा कालखंड मागे पडून नवा उत्साह, नवी उमेद आणि नवलाईने नटलेला गणेशोत्सव वाजू-गाजू लागला आहे. गणपती बाप्पाला तू सुखकर्ता, तू दुखहर्ता असे म्हटले जाते. समर्थ रामदासांनी गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता अशा शब्दात लिहिली आहे आणि ती सर्वदूर म्हटली जाते. माणसांना अनेक अडचणी, समस्या व प्रश्न आहेत, असतात. पण काही उत्सव, सण असे असतात की ज्यामुळे नवी प्रेरणा, स्फूर्ती मिळत असते. दुःख मागे पडून सुखाची अनुभूती येते. कोरोना कालखंडात रस्ते, शाळा, कार्यालये, यात्रा, जत्रा ओस होत्या. माणसे माणसांच्या संपर्काला घाबरत होती. सर्वांनीच कोंडून घेतले होते. अखंड मानव समुहाची परीक्षाच होती. या काळात अवघ्या विश्वाचा कोंडवाडा झाला होता. रुग्णवाहिकांचे सायरन आणि आक्रोश ऐकू येत होते. अनेकांना अनेक फटके, तडाखे सोसावे लागले. उद्योग-व्यवसाय-व्यापार कोलमडून पडले पण ‘आज उन्हाळा उद्या हिवाळा’ हे सृष्टीचे कवतिक पुन्हा समोर आले. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला आपला देश लसीकरणात आघाडीवर राहिला आणि पुन्हा हळूहळू सारे पूर्वपदावर येऊ लागले. अक्षरशः दुःखहरण झाले. यंदा पंढरीच्या पांडुरंगाची चैत्रवारी झाली. आषाढ वारी झाली. गावोगावी यात्रा-जत्रा, कुस्त्यांची मैदाने, लग्नसोहळे सुरु झाले आणि महाराष्ट्र सरकारनेही उत्सवावरचे निर्बंध शिथिल केले. दहीहंडीचे थरावर थर लागले, शाळा-महाविद्यालये गजबजली आणि आता दहा दिवसांच्या गणेश उत्सवाला प्रारंभ होतो आहे. गणेशोत्सवाच्या धार्मिक व पौराणिक कथा वेगळय़ा पण गणेश उत्सव हे कार्यकर्ते घडवण्याचे विद्यापीठ आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेश उत्सव यांना महत्व व चालना दिली आणि त्यातून स्वातंत्र्यासाठी प्रेरणादायी फळी उभारली आणि पुढे हे दोन्ही उत्सव महाराष्ट्राची ओळख बनले. जगभर गणेशोत्सव साजरा होतो. मराठी माणूस जेथे जेथे पोहचला तेथे तेथे हा उत्सव अपार भक्तीभावाने, उत्साहाने आणि विविध उपक्रमाने साजरा होतो. गणपतीची अनेक नावे आहेत. तसा तो चौसष्ट कलांचा अधिपती मानला जातो आणि सलग दहा दिवस हा उत्सव साजरा होत असल्याने हे दहा दिवस कला-संस्कृती-विद्या यांच्या अविष्काराचे असतात. संगीताच्या मैफिली होतात, स्पर्धा होतात, नृत्यांचे कार्यक्रम होतात, कुठे प्रसाद, महाप्रसाद होतात. एक काळ असा होता त्याकाळी गणेशोत्सवाला प्रबोधनाचे वलय होते. अभिजात मनोरंजनाची चौकट होती आणि सर्वांना एकत्रित आणून सरसावण्याची शक्ती दिली जात असे. आज जे मोठे नेते, लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा श्रीगणेशा या उत्सवात झाला. हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्वी यानिमित्ताने कथाकथनाचे कार्यक्रम होत. शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर यांनी काळ गाजवला होता. भावगीत गायनाचे, गीत रामायणाचे कार्यक्रम होत. गजानन वाटवे, जे.एल. रानडे अशी अनेक नावे सांगता येतील. कलापथकांचे कार्यक्रम होत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी त्यासाठी फेमस असे. कोकणात तर गणेशोत्सवाला वेगळे महत्व आहे. यानिमित्ताने कोकणी माणूस गावात येतो, रमतो. दशावतारी बघतो. उकडीचे मोदक वगैरे मिष्टांने खातो आणि अवघा शिणवटा विसरुन पुन्हा ताजातवाना होतो. सांगली, मिरज, तासगाव, पुणे इकडेही गणपती उत्सवाच्या वेगळय़ा प्रथा, परंपरा आहे. कुठे रथयात्रा निघते. जागतिक कीर्तीचे कलाकार बोलावून फेस्टिव्हल साजरा होतो. प्रथा, परंपरा, उपक्रम काहीही असले तरी मूळ सूत्र एकत्रीकरण, समरसता आणि पावित्र्य, आनंद. यंदाही गॅपनंतर हा उत्सव साजरा होतो आहे. या उत्सवाला अधिक व्यापक, आनंददायी आणि रंजन-प्रबोधनासाठी सक्षम बनवण्याची गरज आहे. एक जपानी उक्तानुसार, तुम्हाला एक रुपया मिळाला तर सर्व पैसे भाकरीसाठी खर्च करु नका दहा पैसे कलेसाठी बाजूला ठेवा. एखादे फुल खरेदी करा. इतरांना आनंद द्या, आपण आनंद घ्या. गणेशोत्सवाचाही तोच संदेश असतो. त्यामुळे घरगुती असो बिल्डिंगचा असो, कार्यालयाचा वा सार्वजनिक गणेशोत्सव त्यांचे मुख्य सूत्र आनंद, समाधान व समाज म्हणून संघटित येणे. माणूसपण जपत चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा असतो. अलिकडे गणेश उत्सव काळात दहशतवाद आणि महानगरातील स्फोट, दंगली वगैरे आटोक्यात आहेत. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळी आनंदायी किनार आहे. पण कर्णकर्कश ध्वनी प्रदूषण, डॉल्बी सारखे अतिरेकी वाजप यंत्रणा आणि बेभान मिरवणुका यांना आळा घातला पाहिजे. याच जोडीला महाप्रसाद आणि जेवणावळी म्हणजे गणेश उत्सव या भ्रमातूनही बाहेर पडत नवनवे समाजपयोगी उपक्रम राबवले पाहिजे. चित्रकला स्पर्धा असो, गायन, वादन स्पर्धा किंवा पाककला, कथाकथन, प्रबोधन असे उपक्रम हाताळले पाहिजेत. हल्ली दूरचित्रवाणी आणि स्मार्टफोन यामुळे करमणुकीचे अर्जिण अशी स्थिती आहे. त्यामुळे एकेकाळी गणेशोत्सवात टुरिंग टॉकीजचा सिनेमा बघणे ही जी मजा आता उरलेली नाही. बदलत्या काळाप्रमाणे आपण आपले सण-उत्सव व त्यांचे स्वरुप बदलले पाहिजे. पण या उत्सवाचा जो मूळ गाभा आहे तो कायम ठेवला पाहिजे. जगावरचे कोरोना संकट पूर्ण नष्ट झालेले नाही. या संकटाच्या तडाख्याने उद्भवलेले प्रश्नही भयावह आहेत. जागतिक मंदी, बेरोजगारी, वाढत असलेला चंगळवाद, आरोग्याचे प्रश्न, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, हरवत चाललेली सामाजिक संवेदना असे अनेक विषय उत्सवाच्या काळात चर्चेतून सोडवण्यासाठी कार्यक्रम घेता येतील. महाराष्ट्रातील काही गणेश मंडळे अनाथासाठी, आजारी, गरिबांसाठी किंवा शिक्षणासाठी मदत करतात. पण अजूनही मोठी पाऊले पडली पाहिजेत. गणपती बाप्पा आणि त्यांचा दहा दिवसांचा उत्सव उपेक्षित, गरीब याबरोबरच सर्वांना सुखकारक ठरला पाहिजे. पोलीस यंत्रणेलाही लोकांनी सहकार्य केले पाहिजे. आजपासून मोरयाचा गजर सुरु होईल तो वाढत-वाढत अनंत चतुदर्शीला उच्चारवात पोहोचेल. सर्वांना सुख, आनंद, समाधान, नवी बुद्धी, नवी प्रेरणा आणि सृजनशीलता देईल. गणरायाच्या चरणी तीच प्रार्थना. व सर्वांना गणेश चतुर्थी व गणेश उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा…!
Previous Articleहिनामनोर चक्रीवादळ जपानला धडकणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.