महाराष्ट्रात गणपती उत्सव जोरात सुरु आहे. दोन वर्षे घरात कोंडली गेलेली माणसं लसीकरणाचा बुस्टर घेऊन ‘बाप्पा मोरया’ च्या गजरात नाचताना, जल्लोष करताना दिसत आहेत. सांगली, कोल्हापूर असो की पुणे, ठाणे, मुंबई सगळीकडे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. सण व उत्सवावरील निर्बंध कमी झाल्याने लोकांचा उत्साह दुणावला आहे. त्याच जोडीला मात्र संयम आणि संवेदना हरवत चाललेली काही माणसे ध्वनीप्रदुषणापासून निसर्ग नियम मोडण्यासाठी सरसावताना कचरत नाहीत. हॉर्न, एअर हॉर्न, रेल्वेचा हॉर्न आणि मोठे मोठे ध्वनीवर्धक वापरुन सुरु असलेल्या संगीत रचना, थरकाप निर्माण करत आहेत. गावोगावचे भोंगे पूर्वपदावर आले आहेत आणि ध्वनीप्रदूषणावर, निसर्ग रक्षणावर चर्चा होते पण फारशी कारवाई होत नाही. घराजवळून मिरवणूक गेली आणि आवाजाने खिडक्यांची तावदाने फुटली, वृद्ध माणसांचा कान फुटला किंवा वाढलेल्या रेल्वेच्या फेऱया आणि त्यांचे कर्णकर्कश हॉर्न यामुळे रेल्वेरूळ परिसरात लोकांचे मनःस्वास्थ बिघडले अशी रूग्णसंख्या वाढली आहे. जगभर रॉकेट टेक्नॉलॉजी आली. माणूस चंद्र, मंगळ ग्रहाला गवसणी घालतो आहे. पण विनाहॉर्न रेल्वे आणि विनाहॉर्न ड्रायव्हिंग ही सवय आपण आत्मसात केलेली नाही. काही देशात तेथील लोक अभिमानाने सांगतात या रस्त्यावर राष्ट्रप्रमुख राहतात, शाळा व वृद्धाश्रम आहे, रुग्णालय आहे. या रस्त्यावर गेल्या 25 वर्षात कुणीही हॉर्न वाजवला नाही. ध्वनीप्रदूषण, पाणी प्रदूषण, हवा व पर्यावरण रक्षण यावर प्रबोधन खूप झाले आता कृतीची गरज आहे. लोकांनी अनंतचतुर्दशी दिवशी मिरवणुकीत या संदर्भाने काही पुढचे पाऊल उचलले तर बाप्पाचा उत्सव अधिक अर्थपूर्ण होईल. सारे कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. गणेशोत्सवात दसऱयाच्या सीमोल्लंघनाची पायाभरणी सुरु झाली आहे. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत गणपती आरत्यांना हजेरी लावत आहेत. त्याच जोडीला उपमुख्यमंत्र्यांचा बाप्पा, वर्षावरचा बाप्पा, राज ठाकरे यांच्या घरचा बाप्पा येथे दर्शनासाठी होणारी हालचाल आगामी मोहिमेची दिशादर्शक मानली जाते आहे. मुंबई महापालिकेत गेल्यावेळी शिवसेना काठावर पास झाली होती. भाजपाने यावेळी मुंबई मनपातून ठाकरेंना धक्का देण्याचा चंग बांधला आहे. अमित शहा यांनी केलेला दौरा, घेतलेल्या भेटी-गाठी-मेळावे-बैठका आणि मुंबई मनपासाठी निर्धारित केलेले उद्दीष्ट पूर्ण बोलके आहे. पण उद्धव ठाकरे, शरद पवार वगैरे मंडळी गोटय़ा खेळत नाहीत त्यांनाही डाव-प्रतिडाव राजकारण तोंडपाठ आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडली. आता काँग्रेस व राष्ट्रवादीची भकले होणार अशी चर्चा आहे. देशपातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यात एक प्रकारची मरगळ व निराशा आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चा होत असतानाच बिहारचे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. काँग्रेसचे युवराज आणि महाराष्ट्राचे जाणते राजे बाशिंग बांधून तयार आहेतच पण मोदींना कसे हटवणार आणि मोदी विरोधकांना कसे एकत्र आणणार हा सवाल आहे. निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर त्यासाठी आकडेमोड आणि व्यूहरचना करत आहेत. त्यांची दिवसरात्र मेहनत सुरु आहे. भाजपात सर्वकाही ऑलवेल नाही. मोठं इनकमिंग, अधिकारचं एकत्रीकरण आणि नितीन गडकरी सारख्या लोकप्रिय नेत्याला डावलण्याचे प्रयत्न याचीही देशात व पक्षात कुजबुज आहे. पण देशपातळीवर आजमितीला नरेंद्र मोदी यांच्याशी व भाजपाशी काटय़ाची लढत करेल असे नेतृत्व विरोधकांकडे नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपाशी काडीमोड घेत आपले नवे गणित जमवले व आता त्यांनी राष्ट्रीय राजकारणात भाजपाविरोधी फळी बांधण्यासाठी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. कम्युनिस्ट, आप, माकप, राष्ट्रवादी, ममता, डीएमके, शिवसेना यांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. आता ममता आणि कम्युनिस्ट बंगालमध्ये एकत्र कसे येणार हे नितीशबाबूंनाच माहीत. शरद पवारांचेही हेच प्रयत्न आहेत. भाजप विरोधकांची मोट बांधण्यात आणि लोकसभेसाठी फासे टाकण्यात ते मग्न असताना इकडे महाराष्ट्रात बंड की उठाव झाला. त्यामुळे त्यांची गणिते थोडी बिघडली असली तरी गणित साधण्यात त्यांचा हातखंडा आहे. काँग्रेसला थोडे कमी महत्व देऊन ममता बॅनर्जी, शरद पवार, नितीशकुमार यांच्या सुरु असलेल्या हालचाली काँग्रेस नेतृत्वाला लक्षात आल्या आहेत. त्यांनी दिल्लीत मोठी धरणं आणि आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा घोषित केली आहे. राहुल गांधींचे हे रिलाँचींग मानले जाते. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा 7 सप्टेंबरला सुरु होईल. सुमारे साडेतीन हजार किमीची ही यात्रा काँग्रेसपक्षाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क उपक्रम असेल. बारा राज्ये आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातून यात्रेचा प्रवास होईल व राहुल गांधींसह शंभर पदयात्री पूर्ण यात्रेत सहभागी होतील. भारत जोडो यात्रेत त्या त्या राज्यातील पदाधिकारी व प्रमुख मंडळी सहभागी होणार आहेत. या यात्रेला समर्थन देण्यासाठी प्रत्येक राज्यात छोटय़ा छोटय़ा पदयात्रा निघणार आहेत. कॉंग्रेसने मोठी तयारी केली आहे. काश्मिरमध्ये ढोल वाजू लागले आहेत. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे काँग्रेसने जोर केला आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यावर विरोधकांचे लक्ष एकवटले आहे. भाजपा विरोधकांत विचारधारणेपासून कार्यपद्धतीपर्यंत आणि नेतृत्वापासून प्रतिभेपर्यंत अनेक समस्या आहेत. या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे अध्यक्ष कुणी असो काँग्रेस नेतृत्व राहुल गांधीच करणार हा संदेश पक्षात पसरला आहे. भाजपाने काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेची टिंगल करत प्रथम भ्रष्टाचार छोडो अशी टिप्पणी केली आहे. एकूणच महाराष्ट्रासह दिल्लीत दसऱयाआधी मोहिमांची रणवाद्ये वाजू लागली आहेत. शिवतीर्थावर दसरा मेळावा, त्यात सवाल जवाब हे सगळे आकर्षण आहेच. पण त्या पलीकडे निसर्गाचे फटके, ढगफुटी, महापूर, बेरोजगारी असे अनेक विषय जनसामान्यांच्या जीवनात तीव्र बनले आहेत. पण सर्वांची दसऱयाच्या मोहिमेची तयारी सुरु असून रणवाद्ये वाजू लागली आहेत. जसा दसरा टप्प्यात येईल तसे अंतरंग स्पष्ट होतील. तुर्त राहुल गांधींची पदयात्रा कशी होते आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात न्यायालय काय निवाडा करते हेच लक्षवेधी विषय आहेत.
Trending
- आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक
- चित्रफीत प्रकरणाची माहिती असूनही भाजपचा निजदशी निवडणूक समझोता
- नेपाळच्या नोटांवरील नकाशात 3 भारतीय क्षेत्रे
- बैलहोंगल तालुक्यात चार लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त
- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा
- काश्मीरमध्ये ड्रग्ज तस्कराची 1.80 कोटींची मालमत्ता जप्त
- भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी
- चेन्नईसमोर फॉर्मात आलेल्या पंजाब किंग्जचे आज आव्हान