केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला
कराड / प्रतिनिधी
राज्यात सत्ताबदल झाला असून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे. एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार असून निवडणूक आयोगाकडे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असून त्यांनी हे चिन्ह न गोठवता आपल्याकडे घ्यावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सक्रीय नेत्यांचे सरकार आले आहे. दोन्ही नेते राज्यभर फिरून लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. या सरकारला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. या सत्तेत रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद, दोन ते तीन महामंडळे, उर्वरित महामंडळांत सदस्य, तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये एक आमदार रिपब्लिकन पक्षाला मिळावा, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा स्तरावरही कार्यकर्त्यांना सत्तेत संधी मिळावी, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून चर्चा केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्षाची युती पुरेशी आहे. या युतीत मनसेची गरज नाही. मनसेवर मुंबईतील उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय तसेच गुजराथी समाज नाराज आहे. त्यामुळे या युतीत मनसेची गरज नसून रिपब्लिकन पक्ष पुरेसा आहे. मुंबईतील सत्तेत उपमहापौरपद रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशीही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांना पक्ष जोडता आला नाही, ते देश काय जोडणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले की, ज्यांना पक्ष जोडता आला नाही, ते पक्ष काय जोडणार. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा नेता नाही. विरोधी पक्षांची एकजूट झाली तरी त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनाच होईल. भाजपा 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल. पेट्रोल-डिझेलचे दरही कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आठवले यांनी सांगितले