कोल्हापूर / प्रतिनिधी
गुजरात, हरियाणा, राजस्थान व झारखंड नंतर लंम्पी या आजाराने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असून केंद्र व राज्य सरकार या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरत आहे. या आजारात जनावरे दगावण्याची शक्यता असल्याने व लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. तातडीचे ऊपाययोजना म्हणून येत्या दहा दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करून खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचे केंद्र व राज्य सरकारकडून तातडीने विमा उतरविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आपल्या निवेदनात मागणी करताना ते म्हणाले “गुजरात व राजस्थान या राज्यामध्ये वेळेत व योग्य उपचार न झाल्याने लंम्पी या आजाराने मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. सदर आजारातील देशी जनावरांच्या मृत होण्याची टक्केवारीचे प्रमाण जवळपास १० टक्के पर्यंत गेले आहे. मात्र संबंधित राज्य सरकारकडून अपयश लपविण्यासाठी चुकीची आकडेवारी दर्शविली जात आहे. या आजारामुळेच देशामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे. राज्य सरकारने लसीकरणास जरी सुरवात केले असले तरी राज्यात पशुसंवर्धन विभागात डॅाक्टरांची पदे भरलेली नसल्याने डॅाक्टर व कर्मचारी यांची संख्या अपुरी पडत आहे.”
पुढे बोलताना “सदर आजाराचा प्रामुख्याने देशी जनावरामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असून महाराष्ट्रात खिलार, साहिवाल, गीर, देवणी, कोकण गीर, रेड सिंधी कांक्रेट या देशी जनावरांची संख्या जास्त आहे. बाजारांमध्ये जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या असून या आजारात जनावरे दगावल्यास पशुपालकांना हा मोठा फटका बसणार आहे. याकरिता केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन ज्याप्रमाणे कोरोना काळात कमी हप्त्यामध्ये जनतेला विमा उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे राज्यातील सर्वंच जनावारांचा येत्या दहा दिवसात तातडीने विमा उतरविण्यात यावा. जेणेकरुन एखादे जनावरे यामध्ये दगाविल्यास संबंधित पशुपालकास होणा-या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळून त्या कुटुंबास आधार मिळेल.” अशी मागणी शेट्टी यांनी केली.