बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची भारतभेट महत्त्वाची ठरली. भारताच्या अन्य शेजारी देशांप्रमाणेच बांगलादेशानेही चीनबरोबर हातमिळवणी केलेली असली तरी वर्तमान पंतप्रधान व्यवहारी असून आपल्या देशाच्या भवितव्यासाठी चीनवर परावलंबित्व ठेवण्यावर त्यांचा विश्वास नाही. त्यासाठी त्यांनी भारताबरोबर मैत्रिपूर्ण संबंधांना बळकटी देण्यासाठी भारत दौरा केला.
भारत सरकारने नुकतेच बांगलादेशाबरोबर सात वेगवेगळे करार केले. यातील बहुतेक करार हे बांगलादेशासाठी पूरक आहेत. भारताच्या ईशान्य प्रांताप्रमाणेच बांगलादेशाला सातत्याने जलप्रलयाला सामोरे जावे लागते. त्यामुळे हजारो एकर जमिनीतील पीक नष्ट होते. अशा या नद्यांवर धरणांची बांधणी करून महापुराचा असलेला धोका कमी करण्याबरोबरच नेपाळ व भूतानमधून वितरित होणारी वीज भारतीय सीमा क्षेत्रातून वाहून नेण्याचा करार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेने विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणांचा वापर बांगलादेशासाठी करण्याबरोबरच तेथील कर्मचाऱयांना त्यासाठी प्रशिक्षित करण्याचाही यात समावेश आहे. अवकाश संशोधन आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासासाठीही वेगवेगळे करार केलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय न्यायव्यवस्थेतील आधुनिकीकरण आणि त्यातील माहिती-तंत्रज्ञानाची घातलेली सांगड बांगलादेशाला हवी आहे. त्यासाठी भारतीय तंत्रज्ञ बांगलादेशातील मनुष्यबळाला प्रशिक्षण देणार आहेत.
यातील बहुतेक करार हे बांगलादेशासाठी फायदेशीर आहेत. भारताला चारही बाजूंनी घेरण्यासाठी चीन सरकारने डाव टाकलेला आहे. त्यात पाकिस्तान मग्रुरीने अडकलेला आहे. तर नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका चिनी भुलभुलैयाला भुललेले आहेत. यातील पाकिस्तान आणि श्रीलंका दिवाळखोर बनलेले आहेत. तर बांगलादेशही त्याच वाटेवरून चाललेला आहे. म्हणून त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणे भारताला अव्हेरण्याची चूक केलेली नाही. तसेच चीन सरकारला मोकळे रान दिलेले नाही. श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानप्रमाणेच बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह या चिनी आर्थिक विकास प्रकल्पात बांगलादेशही सहभागी झालेला आहे. या प्रकल्पांतर्गत बांगलादेशात पायरा या बंदराचा विकास करण्याचे कंत्राट चीन सरकारने घेतलेले आहे. तसेच बांगलादेशातील काही रेल्वेमार्ग रुंदीकरणाच्या प्रकल्पांचाही समावेश आहे. हे सर्वच्या सर्व प्रकल्प केवळ चिनी कंपन्यांकडूनच बांधण्यात येत असल्याने व त्यात पारदर्शकता नसल्याने भ्रष्टाचार होत असल्याचा गदारोळ उडाला आहे. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केला असता चिनी कंपन्यांनी बांगलादेशातील तीन रेल्वेमार्ग रुंदीकरण व विस्तारीकरणाचे प्रकल्प सोडून दिलेले आहेत. या प्रकल्पांवरून दोन्ही देशांत तणावही निर्माण झालेला आहे.
पंतप्रधान हसीना वाजेद यांच्यासाठी ही भारत भेट बरीच महत्त्वाची होती. भारत एक आर्थिक महाशक्ती बनू पाहत आहे. जगातील अनेक प्रगत देशांना मागे टाकत भारताने अवकाश संशोधनात अग्रस्थान पटकावलेले आहे. भारताच्या इस्त्रो या संस्थेने आतापर्यंत शेकडो उपग्रह अंतराळात स्थापित केलेले असून क्षेपणास्त्र उत्पादन, ड्रोन, विमान उत्पादनात भारत प्रगत देशांच्या पंक्तीत बसलेला आहे. अण्वस्त्रधारी भारताने भर कोविड काळात लडाख सीमेवरील गलवान खोऱयात चिनी सैनिकांना रोखून धरले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर जाऊन चीन सरकारला थेट ललकारण्याच्या घटनेने भारताच्या शेजारी राष्ट्रांत वेगळाच संदेश गेलेला आहे. भारताच्या या बदलत्या स्वरुपाकडे पाहूनच शेख हसीना वाजेदसारख्या मुत्सद्दी पंतप्रधानांनी आपल्या परराष्ट्रनितीत भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकलेला आहे.कोविड काळानंतर जगभरातील देशांची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. यात चीन सरकारच्या नादी लागलेले दक्षिण आशियातील पाकिस्तान आणि श्रीलंका दिवाळखोरीत पोहोचलेले आहेत. तर बांगलादेशही त्याच वाटेवरून चाललेला आहे. श्रीलंकेला सावरण्यासाठी भारताने आपला शेजारधर्म पाळताना अन्न, इंधन आणि अत्यावश्यक वस्तू पुरविण्याचे काम केले. अशा या शेजाऱयाबरोबर चांगले संबंध ठेवण्याच्या इराद्यानेही हसीना वाजेद यांच्या दौऱयाकडे पाहता येईल. श्रीलंकेप्रमाणेच बांगलादेशातही महागाईविरोधात असंतोष उफाळून आला होता. तत्पूर्वीच बांगलादेश सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपाशी 4.5 अब्ज डॉलर्सच्या तात्काळ कर्जाची मागणी केलेली आहे. सध्या या देशाकडे तीन ते चार महिने पुरेल एवढी विदेशी गंगाजळी आहे. मात्र देशाच्या तिजोरीवरील ताण दूर करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलची एकदम 50 टक्के दरवाढ केलेली आहे. गेल्या दोन दशकांत बांगलादेश सर्वाधिक वेगाने अर्थव्यवस्थेची प्रगती करणारा देश बनला होता. मात्र कोविड काळानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेला घसरण लागली. आयात वाढली निर्यात घटली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपाशी कर्ज मागण्याची वेळ येण्यामागे मोठे कारण म्हणजे बांगलादेशाचा परकीय चलन कमावण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या तयार कपडय़ांच्या उद्योगावर झालेला परिणाम. जगभरातील बडय़ा ब्रँडचे कपडय़ांचे उत्पादन बांगला देशात होते. मात्र कोविड काळानंतर खास करून युरोपात कपडय़ांची मागणी मोठय़ा प्रमाणात घसरली. कोविडचा मोठा फटका युरोप व अमेरिकेला बसल्याने तेथील नागरिकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झालेली असल्याने तयार कपडय़ांच्या खरेदीवर ब्रेक लागला. त्यामुळे तयार कपडय़ांच्या निर्यातीमधून मिळणारे परकीय चलन एकदम बंद झालेले आहे. तसेच कोविड महामारीमुळे अन्य देशांच्या नागरिकांप्रमाणेच बांगलादेशातील अनिवासी बांगलादेशी नागरिकांना मायदेशी परतावे लागल्याने त्यांच्याकडून येणारी परकीय चलनाची गंगाजळी बंद झालेली असून त्याचाही परिणाम विदेशी गंगाजळीवर झालेला आहे.
चिनी राष्ट्राध्यक्ष झी जीन पिंग यांनी 2016 मध्ये बांगलादेशाला भेट दिली होती. त्यानंतर श्रीमती वाजेद यांनी 2019 मध्ये चीनचा दौरा केला होता. या दोन्ही दौऱयानंतर वाजेद सरकारने आपल्या देशातील बरेच प्रकल्प चिनी कंपन्यांना दिले होते. मात्र श्रीलंका, मालदीव, नेपाळ आणि पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा अभ्यास करून वाजेद सरकारने चीनबरोबर असलेल्या घरोब्याला एका मर्यादेत आणून ठेवलेले आहे. बांगलादेशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी चीनपेक्षा भारताकडून अधिकाधिक आधार मिळविण्याच्या हेतूने पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी भारताला भेट दिली. भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असल्याने या क्षेत्रात आपल्या या शेजारी देशाची मदत मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी केलेला आहे. तर दुसऱया बाजूने शेजारी राष्ट्रे भारतापासून दुरावत असल्याने त्याची खंत भारतीय नेत्यांना आहे. पाकिस्तानप्रमाणेच नेपाळ आणि श्रीलंका भारताबरोबर फटकून वागत आहेत. या सर्वांचा बोध घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश, मालदीव, भूतान आदी देशांना बरोबर घेऊन जाण्याचे ठरविल्याचे दिसून येते.
प्रशांत कामत