पर्वतारोहण करण्याचा छंद अनेकांना असतो. कित्येकांना याची एवढी आवड असते की धोका पत्करूनही ते हिमालयासारखे सर्वात उंच पर्वतही सर करण्याचा प्रयत्न करतात. दुर्गम पर्वतरांगांमध्ये कित्येकदा गिर्यारोहक बेपत्ता होण्याचे प्रकार घडतात. अनेकदा वाट चुकल्याने किंवा काही वेळेला खराब हवामानामुळे गिर्यारोहकांचा इतरांशी संपर्क तुटतो. असे बेपत्ता गिर्यारोहक जिवंत परत येणे हे भाग्याचेच समजले जाते. बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. तथापि, आता गिर्याराहकांचे बेपत्ता होणे इतिहासजमा होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीच्या पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या संशोधकांनी एक यंत्रणा विकसित केली असून तिच्या साहाय्याने बेपत्ता गिर्यारोहकाला काही मिनिटात किंवा फार तर एखाद्या तासात शोधता येऊ शकेल.
या संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक रिस्टबँड निर्माण केले असून गिर्यारोहकाने ते आपल्या मनगटावर बांधायचे आहे. जोपर्यंत ते त्याच्या हातात आहे, तोपर्यंत त्याची प्रत्येक हालचाल त्यात टिपली जाणार आहे. तसेच ती सुरक्षित ठिकाणी असणाऱया त्याच्या सहकाऱयांनाही समजणार आहे. गिर्यारोहक बेपत्ता झाल्यास तो नेमक्या कोणत्या ठिकाणी संकटात सापडला आहे, हे त्वरित समजणार आहे. डोंगराळ भागात, विशेषतः हवामान प्रतिकूल असताना गिर्यारोहकाचे नेमके स्थान किंवा लोकेशन शोधून काढणे कठीण असते. पण या रिस्टबँडमुळे आणि त्या रिस्टबँडचा संपर्क सातत्याने नियंत्रण कक्षाशी होत असल्याने बेपत्ता गिर्यारोहकाचे स्थान काही मिनिटात शोधून काढणे आणि त्याला तत्काळ साहाय्य पोहोचविणे शक्मय होणार आहे. सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून गिर्यारोहकाचे स्थान निश्चित करणे शक्मय होणार आहे. या रिस्टबँडमुळे नजीकच्या भविष्यकाळात गिर्यारोहण अधिक सुरक्षित होणार असल्याचे प्रतिपादन या संशोधकांनी केले आहे. आता या रिस्टबँडच्या पेटंटसाठी प्रयत्न केले जात असून संदीप ठाकुर नामक एका स्टार्टअप उद्योजकाने त्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर करण्याची योजना आखली आहे. केवळ गिर्यारोहण करतानाच नव्हे तर अन्य कोणत्याही वेळी हे रिस्टबँड उपयोगकर्त्याचे स्थान शोधण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे.