गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
प्रतिनिधी /बेळगाव
गोरगरीब जनतेला कोरोनाकाळापासून केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱया मोफत रेशन पुरवठय़ाची मुदत पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना या अतिरिक्त मुदतीत मोफत रेशनचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य योजनेचा कालावधी आणखी तीन महिने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोरगरीब आणि दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. मागील दोन वर्षांपासून म्हणजेच कोरोनाकाळापासून या योजनेंतर्गत गोरगरीब जनतेला अतिरिक्त आणि मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. यापूर्वी या योजनेची मुदत सप्टेंबर महिन्यात संपणार होती. मात्र केंद्राने पुन्हा तीन महिने मुदत वाढवून दिल्याने लाभार्थ्यांना डिसेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.
कोरोनाकाळात गोरगरीब जनतेचे धान्याविना हाल होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने मोफत धान्य पुरवठय़ाचा निर्णय घेतला होता. या योजनेची यापूर्वी तीनवेळा मुदत वाढवून दिली होती. कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्यानंतरही सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा डिसेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
डिसेंबरपर्यंत माणसी दहा किलो तांदूळ मिळणार
केंद्र सरकारकडून पाच किलो आणि राज्य सरकारकडून पाच किलो असा एकूण दहा किलो तांदूळ माणसी वितरित केला जात आहे. मुदत वाढविण्यात आल्याने लाभार्थ्यांना डिसेंबरपर्यंत माणसी दहा किलो तांदूळ मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त मोफत धान्याची मुदत संपणार होती. त्यामुळे शासन पुन्हा मोफत धान्याची मुदत वाढविणार का? याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर शासनाने अतिरिक्त आणि मोफत धान्याचा कालावधी वाढवून दिला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना डिसेंबरपर्यंत लाभ घेता येणार आहे.