प्रा. डॉ. मधुकर जाधव यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालयातर्फे ज्ञानसत्राला प्रारंभ : कार्यपद्धती समाजाला फायदेशीर
प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात अतिशय कार्यक्षम प्रशासन व्यवस्था लागू केली होती. त्यांची कार्यपद्धती समाजाला फायदेशीर अशीच होती. न्याय, प्रशासन, करमणूक आणि इतर सर्व गोष्टी एक समाज घडविण्यासाठी आणि बांधण्यासाठी गरजेच्या आहेत. त्या सर्व महाराजांनी स्वराज्यामध्ये घडवून आणल्या. शिस्तबद्ध प्रशासन घडविले. आज देशाला अशाच एका प्रशासनाची गरज आहे, असे उद्गार हलकर्णी, ता. चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी काढले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानसत्रातील पहिले पुष्प गुंफताना ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची शासनव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
व्यासपीठावर अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर, सहकार्यवाह लता पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रा. मधुकर जाधव यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नेताजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
प्रा. जाधव पुढे म्हणाले, आई-वडिलांना नमस्कार करण्याची महाराजांची शास्त्राrय संस्कार पद्धत पुढे येण्याची गरज आहे. हृदयाने आणि मायेने भिडणारी माणसे महाराजांनी तयार केली आणि स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य वाढत असतानाच मथुरेत दुष्काळ पडला. या काळात महाराजांनी शेतकऱयांना धीर दिला. शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापनाची बीजे त्या काळात रुजवली होती. त्याचा आदर्श आता घेतला जात आहे. व्हिएतनाम, पॅरिस येथे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर्श, विविध उदाहरणे देऊन प्रा. जाधव यांनी स्पष्ट केला.
सूत्रसंचालन कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले. प्रसन्न हेरेकर यांनी आभार मानले. यावेळी रसिकश्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.