नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाची दिवाळीत लोकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून अनेक राज्य प्रशासनांनी फटाक्यांविरोधात कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. फटाके वाजविण्यासाठी अनेक नियम लागू करण्यात आले असून ते कठोरपण आणि काटेकोपणे लागू करण्यात यावेत असे दिशानिर्देश स्थानिक अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. दिल्लीतही फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
फटाक्यांच्या अनिर्बंध आतशबाजीमुळे दिवाळीनंतर देशभरात त्वरित प्रदूषणाची पातळी मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचा अनुभव दरवर्षी येतो. यंदाची दिवाळी अधिक स्वच्छ आणि शुद्ध वातावरणात पार पडावी यासाठी अनेक राज्य सरकारांनी कंबर कसल्याचे दिसून येत असून त्यांची उपाययोजना गंभीरपणे लागू करण्यात आली तर प्रदूषणाचा स्तर निश्चितपणे कमी होईल, अशी भावना आहे.
दिल्ली करकारची बंदी
दिल्लीतील सरकाराने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नव्हे तर 1 जानेवारी 2023 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घोषित केला आहे. दिवाळीला फटाके वाजविणाऱयांना सहा महिन्याचा कारावास आणि 200 रुपयांचा दंड केला जाऊ शकतो. या राजधानीच्या शहरात फटाक्यांचे उत्पादन, साठा आणि विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. असा प्रतिबंध गेली सलग दोन वर्षे सुरु आहे. त्याचे परिणाम बऱयापैकी दिसून आल्याने यंदाही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या बंदीचे पालन कठोरपणे करण्याचा निर्धार पोलीसांनी व्यक्त केला.
केवळ दोन तास अनुमती
पंजाब सरकारने दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रतिदिन केवळ दोन तास फटाके वाजविण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. फटाक्याचे उत्पादन, साठा आणि विक्रीवर तसेच वितरणावर पूर्ण बंदी आहे. केवळ परवानपत्र असणाऱया व्यापाऱयांना काही प्रमाणात फटाक्यांची विक्री करण्याची अनुमती देण्यात आली आहे. गुरु नानकदेव यांच्या प्रकाशपर्व काळात 8 नोव्हेंबरला पहाटे चार ते ग्नपाच वाजेपर्यंत तर त्याच दिवशी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत अनुमती आहे.
केवळ हरित फटाक्यांना अनुमती
पश्चिम बंगाल सरकारने राज्यात दिवाळीच्या काळात केवळ हरीत फटाक्यांनी अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या दोन प्राधिकरणांनी तयार केलेल्या नियमांचा आधार घेतला जाणार आहे. कलकत्ता उच्च न्यायालयानेही सरकारला अनेक दिशानिर्देश दिले आहेत. त्यांच्या नुसार केवळ क्युआर कोड असणाऱया फटाक्यांचीच आयात आणि विक्री करण्यास अनुमती देण्यात आली. नियमभंग करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करा अशीही सूचना आहे.
गेली चार वर्षे बंदी
तामिळनाडू राज्यात गेली चार वर्षे फटाक्यांवर बंदी आहे. याच राज्यात देशातील सर्वात जास्त फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथील फटाके देशभर आणि विदेशातही विकले जातात. पण तामिळनाडूत मात्र चार वर्षांपासून बंदी आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळी सहा ते सात आणि संध्याकाळी सात ते आठ या कालावधीत फटाके वाजविण्यास अनुमती देण्यात आली आहे.
पूर्ण बंदी नाही, पण नियम कठोर
उत्तर प्रदेश सरकारने फटाक्यांच्या संदर्भात नवा मार्ग अवलंबिला आहे. या राज्यात फटाक्यांवर पूर्ण बंदी घातलेली नाही मात्र, वजविण्याचे नियम कठोर आहेत. सर्व फटाक्यांची दुकाने दिवाळीच्या दिवसात लोकवस्त्यांपासून दूर स्थापित केली जाणार आहेत. अधिक प्रदूषणकारी फटाक्यांच्या खरेदी-विक्रीला प्रतिबंध केला जाणार आहे. फटाके वाजविण्यावर फारसे कडक नियममन नसले तरी प्रदूषणकारी फटाक्यांची आयात राज्यात होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना प्रदूषण नियंत्रणाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.