रस्त्यावर कचऱयाचे ढिगारे, उद्यानांची दुरवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
रामतीर्थनगरमधील विविध समस्यांमुळे हे नगर महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचे रखडले होते. अलिकडे तर या भागात समस्यांचे डोंगर निर्माण झाले असून, येथील विविध रस्त्यांवर कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. दिवसादेखील पथदीप सुरू ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. बुडा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने रामतीर्थनगरमधील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रामतीर्थनगर वसाहतीमध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली. मात्र काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही वसाहत बुडाने निर्माण केली असून, याची देखभाल बुडाकडून केली जाते. ही वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र रस्त्यांची दुरवस्था, कोसळलेल्या गटारी आणि अस्वच्छता यामुळे सदर वसाहत हस्तांतर करून घेण्यास महापालिकेने नकार दिला होता. त्यामुळे येथील विविध विकासकामे राबविण्याच्या दृष्टीने निविदा काढून कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र परिसरातील स्वच्छतेकडे बुडाचे दुर्लक्ष झाले आहे. रामतीर्थनगरमधील उद्यानाची दुरवस्था झाली असून या परिसरात मुख्य रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरली असून, व्यावसायिकांना आणि रहिवाशांना ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कचऱयाची उचल करण्यासह स्वच्छता करण्याकडे बुडाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या परिसरातील स्वच्छतेची कामे तातडीने हाती घेऊन कचऱयाचे ढिगारे हटविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.