भाडे जास्त असल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास, 350 गाळय़ांची मुदत संपुष्टात
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र ठराविक गाळय़ांसाठीच बोलीवेळी चढाओढ होत आहे. मात्र अन्य गाळय़ांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. गाळय़ांचे भाडे जास्त असल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गाळय़ांचे मोजमाप करून गाळय़ांच्या आवारातच लिलाव प्रक्रिया राबविण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे.
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सदर व्यापारी संकुलातील जुने भाडेकरू न्यायालयात धाव घेत असल्याने मनपाचे गाळे न्यायालयीन वादाच्या कचाटय़ात अडकत आहे. तसेच महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेल्या भाडय़ाची रक्कम जास्त असल्याने लिलावावेळी प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या मालकीच्या 350 हून अधिक गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपल्याने नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत 3 वेळा लिलाव प्रक्रिया राबविल्यानंतर 150 गाळे भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. उर्वरित गाळय़ांना भाडेकरू मिळाले नाहीत. बहुतांश गाळय़ांमध्ये जुने भाडेकरू व्यवसाय करीत असल्याने गाळे रिकामी करण्यास टाळाटाळ चालविली आहे. तसेच भाडय़ाची रक्कम जास्त असल्याचे कारण सांगून लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे.
भाडय़ाची रक्कम बाजार भावापेक्षा जास्त असल्याची तक्रार
जागेचा आकार, इमारतीचा दर्जा, पार्किंगसाठी असलेली जागा, पिण्याचे पाणी व इतर सुविधांची माहिती घेवून महापालिकेने भाडय़ाची रक्कम निश्चित केली होती. मात्र ही रक्कम बाजार भावापेक्षा जास्त असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरविण्यात आली आहे. तीनवेळा लिलाव राबवून देखील काही ठरावीक गाळय़ांसाठीच बोली लावण्यात आली. त्यामुळे भाडय़ाच्या रकमेत कपात करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने विचार चालविला आहे. निश्चित केलेल्या भाडय़ाच्या रकमेची शहानिशा करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा विचार महापालिकेने चालविला आहे.