आमदार डॉ. अंजली निंबाळकर : तालुक्यात हळदी-कुंकू समारंभांतून महिला मेळावे
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आत्मसन्माबाबत कोणतीही तडजोड करू नये. भविष्यकाळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर राहणार आहेत. येणारे शतक हे महिलांचे शतक म्हणून ओळखले जाणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील महिलांना आता नवीन जगाबरोबर राहिले पाहिजे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेची कास महिलांनी धरली पाहिजे. महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण हेच माझे ध्येय असून माझे यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आणि मी ते ध्येय निश्चित गाठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य आमदार अंजली निंबाळकर यांनी चापगाव येथील महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. यावेळी चापगाव, वड्डेबैल, अल्लेहोळ येथील शेकडो महिला उपस्थित होत्या.
येथील लक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध देवतांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर महिलांच्यावतीने आमदार अंजली निंबाळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी अनेक समस्यांबाबत तसेच विकासाबाबत चर्चा केली.
गेल्या आठ दिवसात आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील महिलांचे मेळावे आयोजित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. देवलत्ती, बिडी, नंजिनकोडल, गोधोळी, हिरेमुन्नोळी, कसबा नंदगड, लोंढा, कणकुंबी या ठिकाणी महिलांचे मेळावे घेऊन हळदी-कुंकू समारंभ उपस्थितीत पार पाडले आहेत. यावेळी त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
या महिला मेळाव्यांतून महिला सबलीकरणासाठी उपक्रम व सर्व जाती-धर्माच्या महिलांना एकत्र आणून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिलांनी आपल्या समस्यांसाठी माझ्याशी थेट संपर्क साधावा, तसेच अंगणवाडी, शाळा, दवाखाने, वैद्यकीय सेवा याबाबत काही अडचण अथवा कमतरता भासल्यास माझ्याशी संपर्क साधावा. मी आमदार या नात्याने महिला व बालक यांच्या आरोग्य, शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. यासाठी मी आपल्या बरोबर कायम तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.