मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सवाल; शिंदे-फडणवीस सरकारसह बोम्मईंवरही निशाणा; महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असल्याचा केला संशय व्यक्त
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न न्याय प्रविष्ठ आहे. त्याबाबत न्यायालय काय तो निकाल देईल. मात्र आता अचानकपणे सीमाप्रश्न कसा वरती आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री जत, अक्कलकोट सारख्या गावांवर कसे काय हक्क सांगू लागले आहेत. यामागे काही वेगळा डाव आहे काय? असा संशय व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह कर्नाटक सरकारही निशाणा साधला. राज्यातील मुख्य, महत्वाच्या प्रश्नांकडून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी सीमाप्रश्नाचा मुद्दा बाहेर काढला जातो आहे? की त्यामागे आणखीन वेगळे कारण आहे? याचा शोधही घेण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी दुपारी कोल्हापूर दौऱयावर आले. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन बुधवारपासून ते कोकण दौरा सुरू करणार आहेत. मंगळवारी त्यांनी कोल्हापूर जिल्हय़ातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱयांशी मेळाव्यात संवाद साधला. त्याआधी पत्रकार परिषदेत आपली मते मांडली. यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर, जयराज लांडगे, पुंडलिक जाधव, राजू दिंडोर्ले, राजू जाधव, संजय करजगार, विजय करजगार, प्रसाद पाटील, ऍड. आनंदा चव्हाण आदी उपस्थित होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्हय़ातील गावांवर कर्नाटकचा हक्क सांगितला आहे. याविषयी पत्रकारांनी छेडले असता राज ठाकरे म्हणाले, सीमाप्रश्नाचा मुद्दा अचानकपणे वरती कसा येतो? हाच मला प्रश्न पडला आहे, यामागे काही डाव आहे. राज्यात इतर महत्वाचे गंभीर प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून काही यंत्रणा कार्यरत तर नाही ना? की, त्यामागे वेगळा डाव तर नाही ना? या गोष्टी तपासाव्या लागतील. प्रसारमाध्यमानीही अशा प्रकारच्या बातम्या चालवाव्यात यासाठी प्रयत्न सुरू नाहीत ना? याचाही शोध घ्यावा, असे सांगत अप्रत्यक्षरित्या शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि संशयही व्यक्त केला.
प्रस्थापितांविरोधात लढा, बालेकिल्ले हलतात
कोणताही लढा हा प्रस्थापितांविरोधातच असतो. राज्यात मनसे लढत आली आहे. मी माझ्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी लढत आहे. मी कुणा इतर पक्षासाठी काम करतो, असे आरोप केले जातात. तसे आरोप सर्व पक्षावर होत असतात. त्यामुळे अशा आरोपांकडे मी गंभीरपणे पाहत नाही. मनसेच्या स्थापनेला 16 वर्षे झाली आहे. भाजपची स्थापना (जनसंघ) 1952ceO³es झाली. या पक्षाला पूर्ण ताकदीने सत्तेवर येण्यास 2014 साल उजाडले. शिवसेनेची स्थापना 1966 रोजी झाली. पण मुंबई महापालिकेवर सत्ता आली 1985 साली. त्यामुळे पक्षवाढीला, विस्ताराला वेळ द्यावा लागतो. तो मनसे देत आहे. बालेकिल्ले म्हणाल तर ते हलतात. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले होते, याचे उदाहरण राज ठाकरे यांनी दिले.
पद बसतात आणि पोहच नाही
वादग्रस्त विधाने करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना समाचार घेतला. पदावर असल्याने काही बोलता येत नाही. पण काही जण पदावर बसतात पण त्यांना पोहच येत नाही, अशा शब्दात ठाकरे यांनी कोश्यारी यांना टोला लगावला.
मुख्यमंत्रीपदावरून उतरल्यानंतर कसे दौरे सुरू झाले?
मुख्यमंत्री असताना ते कुणालाही भेट नव्हते, आजाराचे कारण सांगत मंत्री, आमदारांची भेट टाळत होते. पण मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर मात्र ते कसे काय भेटी घेऊ लागले आहेत?, राज्यात दौरे करू लागले आहेत. लोकांना टाळणारे आता भेटू लागले आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढणार
आगामी काळात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वतंत्रपणे, स्वबळावर लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या स्पष्टोक्तीमुळे भाजप-मनसे युतीची शक्यता संपुष्टात आली आहे.
राज ठाकरे म्हणाले,
-आज बुधवारपासून कोकण दौऱयास सावंतवाडीतून सुरूवात.
-दुसऱया टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा दौरा.
-पदाधिकाऱयांबरोबर बोलून निवडणुकीबाबत पुढील दिशा ठरविणार.
-राज्यपाल कोश्यारींना कोणी बोलण्यासाठी स्क्रिप्ट देत नाही ना?
-उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची नव्हे परिस्थितीची नक्कल (चेष्टा) केली होती.
-चित्रपटावर आक्षेप असेल तर दिग्दर्शकाशी चर्चा करा, बोला.
-लिखाणावर शंका असेल तर लेखकाशी बोला.