पुणे / प्रतिनिधी :
Cold will increase in Maharashtra राज्यातील अनेक भागांत शनिवारपासून किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होणार असल्याने थंडीत वाढ होणार आहे. दरम्यान, गुरुवारी महाबळेश्वर येथे सर्वात कमी 16 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
‘मॅन्दोस’ चक्रीवादळानंतर राज्यातील थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने तीव्र थंडीचा अनुभव आता कमी झाला आहे. आठवडाभराच्या या स्थितीनंतर शनिवारपासून पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थानच्या भागात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या भागात बर्फवारी सुरुच आहे. मैदानी भागात राजस्थानातील चुरु येथे सर्वात कमी 2.5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
मॅन्दोस चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याचा प्रभाव घटला होता. याचे द्रोणीय स्थितीत रुपांतर झाल्यानंतर हे क्षेत्र अरबी समुद्रात उतरले असून, याचे न्यून दाबात रुपांतर झाले असून, हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर पश्चिमेकडे जात आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत याचा प्रभाव कमी होईल. हे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असल्याने याचा धोका नाही. तसेच यामुळे राज्यातील ढगाळ वातावरण दूर होत असून, हवामान कोरडे होत असल्याने राज्यात थंडीचा प्रभाव वाढणार आहे. किमान तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घटणार आहे.
अधिक वाचा : पुण्यात विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू
राज्यातील शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा 25.2, सांताक्रूझ 24.4, रत्नागिरी 22.5, डहाणू 24.2, पुणे 17.3, लोहगाव 18.9, जळगाव 21.4, कोल्हापूर 19.5, नाशिक 19.5, सांगली 19.1, सातारा 17.4, सोलापूर 20.5, औरंगाबाद 17.8, परभणी 20.6, नांदेड 22, अकोला 21.7, अमरावती 19.7, बुलढाणा 19.5, ब्रह्मपुरी 18, चंद्रपूर 20, गोंदिया 19.5, नागपूर 19.7, वाशिम 19.2, वर्धा 19.4, यवतमाळ 20, पणजी 22.9.