अक्षर पटेलचे तीन बळी, झाकिर हसनचे शानदार शतक, बांगलादेश दु. डाव 6 बाद 272
वृत्तसंस्था/ चत्तोग्राम
यजमान बांगलादेश आणि भारत यांच्यातील येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघ विजयाच्या समिप पोहोचला आहे. बांगलादेशने दुसऱया डावात चिवट फलंदाजी केल्याने भारताला विजयासाठी शेवटच्या दिवसाची वाट पहावी लागत आहे. अक्षर पटेलच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने कसोटीवर पुन्हा वर्चस्व राखले. बांगलादेशतर्फे शतकवीर झाकिर हसन आणि नझमुल हुसेन यांनी सलामीच्या गडय़ासाठी 124 धावांची शतकरी भागिदारी केली.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात 404 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात आटोपल्याने भारताने 254 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर गिल आणि पुजारा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित करुन बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे कठीण आव्हान दिले. बांगलादेशने बिनबाद 42 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. नझमुल हुसेन शांतो आणि झाकिर हसन यानी भारतीय गोलंदाजीसमोर चिवट फलंदाजी करताना सलामीच्या गडय़ासाठी 46.1 षटकात 124 धावांची शतकी भागिदारी केली. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांना बांगलादेशची हि सलामीची जोडी फोडता आली नाही. नझमुल हुसेन आणि झाकिर हसन यांनी आपली अर्धशतके नोंदविली. उपहारावेळी बांगलादेशने बिनबाद 119 धावांपर्यंत मजल मारली होती. या सत्रामध्ये बांगलादेशच्या या जोडीने 77 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही गडय़ासाठीची ही सर्वोच्च भागिदारी आहे.
खेळाच्या दुसऱया सत्राला प्रारंभ झाल्यानंतर उमेश यादवने बांगलादेशची ही सलामीची जोडी फोडली. नझमुल हुसेन यादवच्या गोलंदाजीवर बाहेर जाणाऱया चेंडूवर फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद झाला. त्याने 156 चेंडूत 7 चौकारांसह 67 धावा जमविल्या. बांगलादेशच्या या सलामीच्या दोन्ही डावखुऱया फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलेच दढपण आणले होते. यानंतर अक्षर पटेलने यासिर अलिचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. कुलदीप यादवने लिटॉन दासला उमेश यादवकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 19 धावा जमविल्या. कसोटी पदार्पणातच शतक झळकविणाऱया झाकिर हुसेनने 224 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 100 धावा जमविल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर तो कोहलीकरवी झेलबाद झाला. बांगलादेशचे यासिर अली, मुशफिकर रहिम आणि नुरुल हसन हे अक्षर पटेल तसेच अश्विन यांच्या गोलंदाजीवर चुकीचे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. झाकिर हसन चौथ्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने मुशफिकर रहिमचा त्रिफळा उडविला. त्याने 50 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. अक्षर पटेलने आणखी एक गडी बाद करताना नुरुल हसनला यष्टीरक्षक पंतकरवी यष्टीचीत केले. त्याने 3 धावा जमविल्या. खेळाच्या दुसऱया सत्रामध्ये. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचे महत्त्वाचे फलंदाज बाद केल्याने पुन्हा भारतीय संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करु शकला. अनुभवी शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज ही बांगलादेशची शेवटची जोडी मैदानात असून भारतीय संघ रविवारी लवकर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. कर्णधार शकिब अल हसन 69 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 40 धावांवर तर मेहदी हसन मिराज 9 धावांवर खेळत आहेत. या जोडीने सातव्या गडय़ासाठी अभेद्य 34 धावांची भर घातली आहे. भारतातर्फे अक्षर पटेलने 50 धावात 3 तर उमेश यादव, कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. बांगलादेशला शेवटच्या दिवसी विजयासाठी आणखी 241 धावांची गरज असून त्यांचे 4 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक – भारत प. डाव ः सर्व बाद 404, बांगलादेश प. डाव ः सर्वबाद 150, भारत दु. डाव ः 2 बाद 258 डाव घोषित, बांगलादेश दु. डाव ः 102 षटकात 6 बाद 272 (झाकिर हसन 100, नजमुल हुसेन शांतो 67, यासिर अली 5, लिटॉन दास 19, मुशफिकुर रहिम 23, नुरुल हसन 3, शकिब अल हसन खेळत आहे 40, मेहदी हसन मिराझ खेळत आहे 9, अक्षर पटेल 3-50, उमेश यादव 1-27, कुलदीप यादव 1-69, रवीचंद्रन अश्विन 1-75).