मंत्री गोविंद गावडे यांची माहिती : पिंपरी-पुणे येथील जागतिक,मराठी परिषदेचा समारोप
विशेष प्रतिनिधी /पणजी
आगामी जागतिक मराठी परिषद गोव्यात घेण्यात येणार असून त्याची जबाबदारी गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे तसेच माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गोव्याचे मराठीशी अतूट नाते आहे. कोकणी आणि मराठी या दोन भाषा भगिनींनी गोव्याच्या संस्कृतीमध्ये फार मोठी व अलौकिक भर घातलेली आहे, असे प्रतिपादन मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
पिंपरी (पुणे) येथे जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अठराव्या जागतिक मराठी परिषदेचा समारोप झाला. यावेळी झालेल्या या समारंभाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार व महाराष्ट्राचे तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तर गोव्याचे कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप खास निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे यांनी गोव्याचे मराठीशी असलेले नाते अतूट आहे. गोवा आज विकासाच्या दृष्टीने अनेक मोठय़ा राज्यांनाही मागे टाकून पुढे गेलेला आहे. मात्र गोव्याने आपली संस्कृती आजही टिकवून ठेवलेली आहे. गोव्यात गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र त्याचबरोबर धालो, फुगडी, रोमटामेळ, तालगडी इत्यादी शिमगोत्सवातील कार्यक्रम, नाटक, कीर्तन, तियात्र, मांडो इत्यादी आपली परंपरा व संस्कृती जोपासलेली आहे. मराठी भाषेने फार मोठे संस्कार केलेले आहेत व ते कधीही विसरता येणार नाहीत. आगामी जागतिक मराठी परिषद पुढील वर्षाच्या प्रारंभ गोव्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपण सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
गोमंतभूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी, धर्मवीर संभाजीराजे यांनीही प्रवेश करून ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. गोव्यात काही किल्ले आणि त्यांचे जतन करण्यासाठी तसेच फर्मागुढी येथील किल्ल्याचे संवर्धन आणि त्याच्या पुनर्बांधणीचा संकल्प गोवा सरकारने सोडलेला आहे. हा संकल्प लवकरच पूर्ण केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
जागतिक मराठी परिषदेत म्हादई विषय गाजला
जागतिक मराठी परिषदेमध्ये ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ हा परिसंवाद आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप व पत्रकार सागर जावडेकर हे सहभागी झाले होते. या तिघांनी म्हादई विषय उचलून धरला. महाराष्ट्र हे गोव्यासाठी मोठय़ा भावासारखे आहे आणि महाराष्ट्राने गोव्याला या बाबतीत सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा, अशी मागणी तिन्ही वक्त्यांनी केली. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष कवी रामदास फुटाणे आणि कविवर्य डॉ. महेश केळूस्कर यांनी तिन्ही वक्त्यांच्या मुलाखती घेतल्या.
विकासाची कवाडे खुली झालीत
मंत्री गोविंद गावडे यांनी मोपा विमानतळ प्रकल्प व झुवारी नदीवरील पूल हे गेल्या महिन्यातील दोन मोठे प्रकल्प गोव्यात कार्यान्वित झाले आणि गोव्याने आतापर्यंत सर्वांत मोठी प्रगती केलेली आहे. गोवा विकासाच्या बाबतीत अग्रेसर आहे, मात्र गोव्यात येणारे वाढते पर्यटक यामुळेच काहीजण गोव्याच्या बदनामीचे षडयंत्र रचित आहेत त्याला कोणीही बळी पडू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. गोव्याचा सांस्कृतिक वारसा गोमंतकियांनी प्राणपणाने जपलेला आहे.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितेतील ओळी उद्घृत करताना मंत्री गावडे म्हणाले की, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत गडय़ा नारळ मधाचे कडय़ाकपारी मधुनी घट फुटते दुधाचे’ याची प्रत्यक्षात प्रचिती येण्यासाठी गोव्यातील शेतकऱयांना थोडे जास्त व अथक प्रयत्न करावे लागतील. गोव्यात मराठी-कोकणी हा वाद नाही, मात्र म्हादईवरून जो वाद निर्माण होतोय तो पाण्यासाठी व पर्यावरण जतनासाठी आहे. त्यासाठी गोव्याला सर्वांच्या मदतीची गरज आहे, असे मंत्री गावडे पुढे म्हणाले.
गोव्याची मुंबई होऊ नये : खलप
यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी गोव्याने विकास केला, प्रगती केली, परंतु त्याचा परिणाम म्हणून गोव्यातील जमिनींवर दिल्ली, मुंबई इत्यादी भागातील मंडळी येऊन वाट्टेल त्या दरात खरेदी करून कब्जा मिळवित आहे. त्यातून गोव्याला बकाल स्वरूप येण्याची भीती आहे. मुंबईत आहे तशा झोपडपट्टय़ा गोव्यात निर्माण होऊ नयेत व सांस्कृतिक बिघाड होऊ नये, असे खलप म्हणाले.
म्हादईप्रश्नी महाराष्ट्राने मोठय़ा भावाचे कर्तव्य निभवावे व गोव्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ऍड. रमाकांत खलप यांनी केले. महाराष्ट्राने गोव्याला तिळारीचे पाणी दोन तृतियांश एवढे दिली. आज गोव्यात जागोजागी माड व नारळ दिसतात. भवितव्यात हे चित्र बदलले तर जाणार नाही ना, अशी भीती ऍड. खलप यांनी व्यक्त केली.
ऊसाचे साखरेशी असलेल्या नात्याप्रमाणे गोव्यात म्हादईचे नाते : जावडेकर
गोव्याचा आज झपाटय़ाने विकास होत आहे. त्याचबरोबर अनेक प्रवृत्ती या विकासाबरोबरच गोव्यात पोहोचल्या. त्यामुळेच भविष्यात गोव्यात गोमंतकीय हेच अल्पसंख्यांक होण्याची भीती पत्रकार सागर जावडेकर यांनी व्यक्त केली. विकासाच्या बाबतीत गोव्याने इ.स. 2000 पासून आक्रमक पाऊल उचलले आहे. त्याचबरोबर विविध विकास प्रकल्पांमुळे गोवा हे सर्वांचे आकर्षण झालेय. त्यातून वाट्टेल त्या दरात जमिनी खरेदी करण्याचे काम होत असल्याने भविष्यात गोमंतकियांना जमिनी मिळतील की नाही, याबाबत शंका उत्पन्न झालेल्या आहेत.
गोव्याचे व मराठीचे नाते हे साखरेचे ऊसाशी असलेले, आईचे कन्येशी असलेले व दूधाचे लोण्याशी असलेल्या नात्याप्रमाणे अतूट आहे. गोव्याने मराठी जपण्याचे व टिकवून ठेवण्याचे काम केलेले आहे. मराठी क्षेत्रात गोव्यात होत असलेले काम हे महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे. गोव्यातील कलाकारांचाही महाराष्ट्राने आदर करावा, असे आवाहन करून सागर जावडेकर यांनी म्हादईच्या लढय़ात महाराष्ट्राने गोव्याला मदत करावी, असे आवाहन केले.
समारोप सोहळय़ाला संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, डॉ. रामदास फुटाणे, गिरीश गांधी आदी उपस्थित होते. अमेरिका, जपान, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आस्ट्रीया, दक्षिण कोरिया, न्यूझिलंड अशा 27 राष्ट्रांतून मराठी प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते.