युवा नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला तोंडावर पाडत अपक्ष उमेदवारी केली. आता त्यांना भाजपचा पाठिंबा मिळू शकतो. राज्य काँग्रेसला एकमुखी नेतृत्व नसल्याचे आणि 40 पैकी प्रत्येक घराणे या ना त्या कारणाने संशयग्रस्त बनल्याचे हे द्योतक आहे. त्यातून या घरण्यांचेही पितळ उघडे पडू लागले आहे.
महाविकास आघाडीतील तीन पक्षांना आणि त्यांच्या राजकारणाला भाजपने किती गांभीर्याने घेतले आहे, याची उदाहरणे समोर येत आहेत. याच आठवडय़ात शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 2018 साली झालेली निवडच बेकायदेशीर असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. त्यात ठाकरे यांच्या पदाची मुदतच 23 जानेवारीला संपणार. म्हणजे आता ठाकरे अडचणीत आले अशाप्रकरची शिवसैनिकांमध्ये चलबिचल होईल अशी हवा निर्माण केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिह्यातील माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासह सहा ठिकाणी छापेमारी झाली आणि जेलमध्ये जाण्याचा तिसरा नंबर मुश्रीफ यांचा लागणार, असेही वातावरण निर्माण केले जात आहे. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने तीन वेळचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली असताना त्यांनी अर्ज न भरता ऐनवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवारच दिला नाही. एकाच वेळी तीनही पक्षांच्या विरोधात सुरू असणाऱया या कारवाया पाहिल्या तर लढाई कोणत्या पातळीवर सुरू आहे, हे सहज लक्षात येते. शिवसेनेविरुद्ध झुंजण्यात भाजपची शक्ती खर्ची पडत नाही. शिवसेनेची सगळी झुंज शिंदे गटाबरोबर सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटावरही आपोआपच दबाव निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्यात भाजपने कमालीचे यश मिळवलेले आहे. दोन्ही काँग्रेसचे प्रमुख नेते संशयाच्या भोवऱयात राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ऐन विधानसभा अधिवेशन काळातसुद्धा आपण पक्षासोबतच आहोत हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वारंवार सिद्ध करावे लागत होते. जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसची फुटलेली मते आणि चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव, शिंदे गट आणि भाजप सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह काही महत्त्वाच्या माजी मंत्री आणि आमदारांची मतदानाला दांडी, काँग्रेसकडे राज्यव्यापी सर्वसंमत नेतृत्व नसणे, शिवसेनेतून रोज एक नवा नेता बाहेर पडणार अशी उठणारी चर्चा
या सगळय़ा वातावरणाने विरोधक
हैराण आहेत.
सत्यजित तांबेनी मामांना बनवले?
सत्यजित तांबे यांनी काँग्रेसला दिलेल्या धक्क्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. बाळासाहेब थोरात यांच्या भाच्याने अशी कृती का केली असावी? याबाबत उलटसुलट चर्चा आहे. एका बाजूला याला बाळासाहेब थोरात यांची मूक संमती आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे तर दुसरीकडे हा कौटुंबिक कलह असल्याचे म्हटले जात आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत विश्वजीत कदम, सतेज पाटील या युवा नेत्यांची जितकी हवा झाली तितकी सत्यजित तांबे यांची झाली नाही. गेले अनेक वर्षे आमदारकीच्या प्रतीक्षेत असणाऱया सत्यजित तांबे यांना त्यामुळे वडिलांच्या जागी विधानपरिषदेवर पदवीधर गटातून उतरण्याशिवाय पर्यायी उरला नाही. पण, संगमनेरच्या इशाऱयावर पाच जिह्यांनी वागावे अशी पूर्वीसारखी स्थिती आता राहिलेली नाही. खुद्द नगर जिह्यात विखे-पाटील यांच्या शक्तीला भाजपमुळे आलेली धार, नाशिक, धुळे जळगाव आणि नंदुरबार या खान्देशातील चार जिह्यात भाजप आणि शिंदे गटाचा वाढलेला जोर या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजित तांबे यांना स्वीकारले जाण्याची शक्मयता फारच कमी. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या सल्ल्यानेच सत्यजित त्यांच्या ऐवजी सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली गेली आणि एबी फॉर्मवर थेट त्यांचे नाव लिहून तो ऐनवेळी तांबे गटाला सुपूर्द करण्यात आला. सत्यजित तांबे आधीपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. त्यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे फडणवीस यांनी प्रकाशन करताना तसा सूचक इशाराही थोरातांना दिला होता. विखे कुटुंबातील उमेदवाराला विरोध करून गिरीश महाजन यांच्या सल्ल्याने उमेदवार द्यायचा किंवा ऐनवेळी उमेदवारच जाहीर करायचा नाही, हे दोन पर्याय होते. भाजपने काँग्रेसमधील गोंधळ पाहून दुसरा पर्याय निवडला आणि तो तंतोतंत लागू पडला! सांगली जिह्यातील विटा येथे एका कार्यक्रमात भाजप खासदार संजय पाटील यांनी अमित विलासराव देशमुख यांना भाजपमध्ये यावे असे निमंत्रण दिले. त्यावर अमित यांनी एका टर्ममध्ये तीन सरकार झाले आता चौथे येऊ शकते. स्थिती काहीही झाली तरी लातूरचा देशमुखवाडा काँग्रेस बरोबरच राहील उलट मंचावरील सर्वांनी आपल्या मूळ पक्षात यावे असे निमंत्रण दिले. हा ठामपणा अपवाद वगळता दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये दिसत नाही आणि म्हणूनच त्यांच्यातील गोंधळ, संशय वाढत चालला आहे.
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचे काय?
ऍड. महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड बेकायदेशीर असून त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्यास निवडणूक आयोगाकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे तीस आमदार आणि बारा खासदार असलेल्या शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देऊन धनुष्यबाण चिन्ह द्यावे अशी मागणी केली आहे.23 जानेवारी 2018 रोजी झालेल्या निवडीची मुदत पुढच्या आठवडय़ात संपते. त्यामुळे ठाकरे यांचा कार्यकाल संपुष्टात आलाय. त्यांना हे पद मिळणार का? असे शंकास्पद वातावरण निर्माण झाले आहे.
शिवराज काटकर