अध्याय चोविसावा
नाथमहाराज सांगतात की, एकनि÷ भक्तांना कोणत्याही प्रकारे भगवंत काहीही कमी पडू देत नाहीत. भक्ताचा कैवारी श्रीकृष्ण आहे, हीच भक्तीरहस्यातील मुख्य गोष्ट आहे. शुद्ध भावाशिवाय जी भक्ती असते, तीच दांभिक किंवा नाटकी भक्ती होय. ज्याप्रमाणे मुगातले कुचर दाणे अपक्व राहतात, तशी दांभिक भक्ती अपक्वच रहावयाची. ‘भक्तीयोगस्य मद्?गतिः’ असे मूळ श्लोकातील पद आहे.
या पदाची व्युत्पत्ती किती आहे कोण जाणे! त्यातील रहस्य जाणणारा मनुष्य पृथ्वीवर विरळा. भागवत हे मुख्यतः भक्तीप्रधान आहे. भक्तीचं वर्णन करत जावं तसतशी तिची गोडी अधिकच वाढते आणि त्यात सांगणारे आणि ते ऐकणारे असे दोघेही न्हाऊन निघतात. यातूनच नवविधा भक्तीची म्हणजे ईश्वराला आनंदित करणाऱया नऊ प्रकारांची कल्पना निघाली पण सर्वांचे उद्दिष्ट ईश्वरभक्ती, हे एकच होय. ही भगवद्भक्ती केली नाही तर त्रिगुणरूपी दोरांनी जीवांच्या पंक्तीच्या पंक्ती बांधल्या जाऊन त्या संसारात जन्मास येतात. त्याबद्दल आता भगवंत उद्धवाला सांगत आहेत.
ते म्हणाले, हे कर्मयुक्त जग कर्मफल देणाऱया कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते. जगाला मुख्यतः मूळ धारण करणारा मी आहे. ब्रह्मदेवाच्या रूपाने उत्पत्ती करणारा रजोगुण मीच आहे. विष्णूच्या रूपाने प्रतिपाळ करणारा सत्वगुण मीच आहे आणि रुद्ररूपाने संहार करणारा तमोगुणही मीच आहे. हे तीन गुण हीच काळाची सत्ता आहे, तो मीच खरोखर निजकाळ असून गुणावस्थेच्या स्वरूपाप्रमाणे उत्पन्न करणारा, पालन करणारा व संहार करणारा आहे. लोकांचे वासनाकर्म विचित्र आहे. तेच काळसत्तेचे आत्मसूत्र होय. त्यानेच हा गुणांनी बद्ध असलेला चराचर संसार उभारला आहे.
जीव गुणकर्माच्या योगाने स्वर्गास चढतो आणि गुणकर्मामुळेच नरकात पडतो. अनेक प्रकारच्या योनींची संकटे गुणकर्मामुळेच त्याला भोगावी लागतात. तो मोठय़ा आनंदाने स्वर्गातील सुखोपभोग भोगून व महाजन आणि तपोलोक भोगून पुढे सत्यलोकापर्यंत वर चढतो. ह्यालाच ‘उन्मजन’ असे म्हणतात. पशु, पक्षी, स्थावर, वृक्ष, पाषाण, किडे वगैरेमध्ये जन्म घेत घेत अखेरीस महानरकामध्ये अधःपतन होणे यालाच ‘निमज्जन’ असे नाव आहे. उंचावर चढून खाली पडणे, या उलाढालीत जे नानाप्रकारची जन्ममरणे भोगवते, ते प्रकृतीपुरुषांचे कार्य आहे. तेच जीवबंधने भोगावयास लावते. लहानमोठे, कृशस्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात, ते सर्व प्रकृती आणि पुरूष या दोघांच्या संयोगानेच.
अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म लहान, बृहत् म्हणजे अत्यंत मोठे, कृश म्हणजे किरकोळपणा असलेले आणि स्थूल म्हणजे पूर्णपणे जड अवयवांनी युक्त असे जे जे दृष्टीला दिसू लागते, जे जे नावारूपाला येते, ते ते प्रकृती आणि पुरुष ह्या उभयतांच्या संयोगानेच झालेले आहे. जे दोन पदार्थाच्या संयोगापासून होते, त्याला जग असे नाव आहे, ते मूर्तिमंत प्रकृतीपुरुषमयच होय. तिसरे स्वरूपच असत नाही. आता ह्या दोहीवेगळे जे निरावयव आहे, जेथून या दोघांचाही उद्भव होतो, तेच सर्वत्र सर्वस्वी व्यापून असलेल्या परब्रह्माबद्दल देवाधिदेव आता सांगत आहे. प्रकृतीपुरुषासह हे जे साकार चराचर दिसते, ते आदी व अंती जसे नश्वर आहे, तसेच ते मध्येही नश्वर आहे. दागिना करावयाच्या आधी जे सोने असते तेच दागिना मोडला तरीही कायम राहते आणि मध्यंतरीही तेच शुद्ध सोने दागिन्याच्या रूपाने भासत असते. मातीचे गोकुळ करावयाच्या आधी केवळ मातीच असते आणि गोकुळ पूर्णपणे मोडले म्हणजेही निखालस मातीच शिल्लक राहते. तीच माती, गोकुळाच्या रूपाने असली, तरी ती खरोखर मातीच भासते. त्याप्रमाणे आदी, मध्य व अंतीही अविनाशी ब्रह्मतत्वच भासत असते. तीन गुणांच्या प्रभावाने विकृत झालेले जे हे जग साकार दिसते, ते सर्व चराचर, ज्याप्रमाणे स्वप्नातील व्यवहार केवळ मायिक असतो, त्याप्रमाणे मायिक होय. सर्व विकारांचे कारण अविद्या हेच आहे. त्या विकारात सत्यता स्थापित करू लागले असता अविद्येलाच खरेपणा येऊ लागेल.
क्रमशः