4 हजार पशुपालकांना मदत : लम्पीचा प्रादुर्भाव कमी
बेळगाव : लम्पीचा प्रादुर्भाव काहीसा कमी होवू लागला आहे. मात्र आतापर्यंत 7539 जनावरे दगावली आहेत. या नुकसानग्रस्त पशुपालकांना आतापर्यंत 9 कोटी 13 लाख 85 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. त्यामुळे लम्पीने अडचणीत सापडलेल्या नुकसानग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सप्टेंबरदरम्यान लम्पीचा शिरकाव झाला होता. तेव्हापासून लम्पीने अनेक जनावरांचा बळी घेतला आहे. विशेषत: बळी गेलेल्यांमध्ये गोवर्गीय जनावरांचा समावेश आहे. दरम्यान शासनाने दगावलेल्या जनावरांसाठी मदत जाहीर केली आहे. बैलासाठी 30, गायीसाठी 20 आणि वासरांसाठी 5 हजार रुपये मदत दिली जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा केली जात आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजार जनावर मालकांना मदत देण्यात आली होती. आतापर्यंत एकूण 4 हजार 17 नुकसानग्रस्त पशुपालकांपर्यंत मदत पोहोचली आहे.
सुरुवातीच्या काळात बेळगाव तालुक्यात अधिक प्रादुर्भाव होता. त्यानंतर सौंदत्ती, बैलहोंगल आणि इतर जिल्ह्यातदेखील प्रादुर्भाव वाढला. यामुळे निष्पाप 7 हजारांहून अधिक जनावरांचा बळी गेला आहे. दरम्यान पशुसंगोपन खात्याने रोगावर नियंत्रण आणण्यासाठी गोटफॉक्स लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 12 लाख 97 हजार 480 जनावरांना लस टोचण्यात आली आहे. त्यामुळे रोगावर नियंत्रण आणण्यास खात्याला काहीसे यश आले आहे. जिल्ह्यातून लम्पीला हद्दपार करण्यासाठी खात्याने घरोघरी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली आहे. गोवर्गीय गाय, बैल आणि वासरांना लस दिली गेली आहे. शिवाय या मोहिमेत सातत्य राखून अद्याप निरंतर सुरू ठेवण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 52 हजार 549 जनावरांना लागण झाली होती. त्यापैकी 40 हजार 247 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
सर्वत्र लसीकरण मोहीम
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत आहे. एखादे दुसरे जनावर आढळू लागले आहे. शिवाय सर्वत्र लसीकरण मोहीम पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे लम्पी हद्दपार झाला आहे. शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचविली जात आहे.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)