फिलिपाईन्समधील अजब कायदा
संतापाच्या भरात अनेकदा लोक अविवेकी कृत्य करून जातात. संतापामुळेच अनेक नात्यांमध्ये वितुष्ट आल्याचे पहायला मिळाले असेल. एका अध्ययनानुसार संतापाच्या स्थितीत शरीर आणि मेंदूत काही असे बदल घडून येतात, जे हृदयविकाराचा धक्का आणि स्ट्रोक यासारख्या समस्यांचे कारण ठरू शकते. अशा स्थितीत विनाकारण संतापण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे संताप येत असतो. अशा लोकांना हाताळण्यासाठी फिलिपाईन्समध्ये कायदा आहे. या देशात कुणाच्याही संतापास कारणीभूत ठरणे गुन्हा आहे.
फिलिपाईन्समध्ये केवळ संतापास कारणीभूत ठरल्यास 75 पाउंडचा दंड भरावा लागू शकतो. भारतीय चलनात दंडाचा हा आकडा 7500 रुपये इतका आहे. हा कायदा 1930 मध्ये लागू करण्यात आला होता. कुणालाही विनाकारण त्रास देणे, संतापास कारणीभूत ठरणे एकप्रकारे शोषणच आहे, याचमुळे अशा व्यक्तीला शित्रा मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते. त्या काळात 3 पाउंडचा दंड आणि 30 दिवसांचा तुरुंगवास निश्चित करण्यात आला होता.
फिलिपाईन्स हे पर्यटनाचे केंद्र असल्याने विदेशी लोकांना हा कायदा माहित नसतो, यामुळे अनेकांना तुरुंगात जावे लागले. यानंतर जगभरातून या कायद्यावर टीका करण्यात आली होती. हा कायदा अत्यंत अस्पष्ट असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याचमुळे दबावापोटी 2020 मध्ये तेथील सरकारने या कायद्यात काही बदल केले. दुसऱयाला जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले वर्तन या कायद्याच्या कक्षेत येईल अशी व्याख्या स्पष्ट करण्यात आली.
रांगेत उभे राहिल्यास…
फिलिपाईन्सच्या सरकारने या कायद्याची कठोरता कमी करण्याऐवजी वाढविली. पूर्वी दंडाची रक्कम 3 पाउंड होती, ती आता 75 पाउंड पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच यात 25 पट वाढ करण्यात आली आहे. तुरुंगवासाची तरतूद अद्यापही कायम आहे. एवढेच नाही तर जर तुम्ही रांगेत उभे असाल तर कुणाला धक्का देता येत नाही. अशाप्रकारचे कृत्य देखील या कायद्याच्या अंतर्गत गुन्हय़ाच्या शेणीत मोडते. समोरच्या व्यक्तीने तक्रार केल्यास संबंधिताला तुरुंगात जाण्यासह मोठा दंड भरावा लागू शकतो.