पुणे / प्रतिनिधी :
गेली 30 वर्षे भाजपाची पकड व वर्चस्व असलेल्या कसबा मतदारसंघातील जनता यंदा ‘आम्ही गुलाम नाही’ हे या पोटनिवडणुकीतून दाखवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी क्रीडा मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या पक्ष व चिन्हाविषयीचा आयोगाचा निकाल दबावापोटी घेण्यात आला असल्याची टीकाही त्यांनी केली.
कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले असता काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केदार म्हणाले, नुकत्याच झालेल्या नागपूरमधील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमध्ये भाजपाचे झालेले पानिपत यामुळे संघाचे हेडक्वार्टर व भाजपा राज्यातील व देशातील प्रमुख नेत्यांचा जिल्हा म्हणून नागपूरची ओळख आहे. हा घाव त्यांना वर्मी लागला असल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून भाजपचे सगळेच राज्यातील व देशातील नेते पुण्याकडे येत आहेत. कसब्यामध्ये मागील तीस वर्षापासून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही येथील पाणी प्रश्न सुटला नाही, हे भाजपाचे अपयश आहे.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंसाठी आगामी काळ बिकट
पुणेकर बदलाला महत्त्व देतात
पुणे शहराला क्रीडा विद्यापीठ देण्याचा निर्णय महाविकास सरकारने घेतला. पुण्याचे महत्त्व व देशातील स्थान लक्षात घेता पुणेकर नेहमी बदलाला प्राधान्य देतात. कसब्यामध्येही पुणेकर जनता त्याचा प्रत्यय घडवतील, असा मला आत्मविश्वास असल्याचे केदार यांनी सांगितले.
न्यायालयच न्याय करेल
निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत दिलेल्या निकालाबाबत केदार यांना विचारले असता ते म्हणाले, निकालाबाबत माझ्या मनात शंका आहेत. याबाबत उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आता याचा न्याय हा न्यायपालिकाच करेल, असेही त्यांनी सांगितली.