ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना आजपासून (17 मार्च) कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात अध्यादेश काढला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महिलांना बसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. या योजनेला ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम सरकारकडून महामंडळाला मिळणार आहे.
राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना प्रवासी तिकीट दरात 33 टक्के ते 100 टक्के सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाते.
अधिक वाचा : शिक्षक अभियोग्यता-बुद्धिमापन चाचणीचा निकाल 24 मार्चदरम्यान