दुसरी वनडे लढत 10 गडय़ांनी जिंकून कांगारूंची मालिकेत बरोबरी, स्टार्कचे 5 बळी, मार्श-हेड यांची नाबाद अर्धशतके
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची विध्वंसक गोलंदाजी आणि मिचेल मार्श व टॅव्हिस हेड यांनी धडाकेबाज नाबाद अर्धशतकांसह अभेद्य शतकी भागीदारी नोंदवल्यामुळे ऑस्ट्रेलियाने येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात यजमान भारताचा 10 गडय़ांनी फडशा पाडत एकतर्फी विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 53 धावांत 5 बळी टिपणाऱया स्टार्कला सामनावीराचा बहुमान मिळाला.
भारताला प्रथम फलंदाजी देण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय चांगलाच फलद्रूप झाला. पहिल्याच षटकापासून भारतीय डावाच्या गळतीला सुरुवात झाली, ती अखेरपर्यंत थांबली नाही. भारताचा डाव फक्त 26 षटकांत केवळ 117 धावांत गुंडाळल्यानंतर 11 षटकांतच ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमविता आणि तब्बल 39 (234 चेंडू) षटके बाकी ठेवत विजयाचे उद्दिष्ट आरामात गाठले. चेंडूंच्या बाबतीत भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही तिसऱया क्रमांकाची निचांकी तर मायदेशातील चौथ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियासमोर 118 धावांचे माफक आव्हान होते. त्यामुळे त्यांना रोखण्याचे अशक्यप्राय आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर होते. पण सीम व स्विंग गोलंदाजीस अनुकूल असणाऱया खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज फार काही करू शकले नाहीत. सुरुवातीला स्टार्क व त्याच्या सहकारी वेगवान गोलंदाजांची भेदक गोलंदाजी खेळणे भारताला खूपच कठीण गेले. मनोबल खचविणारा हा पराभव असल्याने याच वर्षी भारतात होणाऱया वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.
हेड-मार्श यांची फटकेबाजी
हेड व मार्श यांनी मात्र भारतीय गोलंदाजी सहजपणे खेळून काढत सामना झटपट संपवला. मार्शने आक्रमक फटकेबाजी करीत 36 चेंडूतच 6 चौकार, 6 षटकारांची बरसात करीत नाबाद 66 धावा झोडपल्या तर त्याचा साथीदार हेडनेही त्याला पूरक साथ देत 30 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा फटकावल्या. मार्शचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. मुंबईतील पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतक नोंदवले होते. या जोडीने शमी व सिराज यांच्या पहिल्या 6 षटकांतच 66 धावांची भर घातली होती. भारतीय जलद गोलंदाजांना खेळपट्टीकडून प्रतिसाद मिळविण्यात अपयश आले, हे स्पष्ट झाले. वनडेमध्ये भारतावर 10 गडय़ांनी विजय मिळविण्याची ही ऑस्ट्रेलियाची दुसरी वेळ आहे. बुधवारी 22 मार्च रोजी होणाऱया तिसऱया सामन्यात मालिकेचा निर्णय निश्चित होणार आहे.
स्टार्कने भेदक माऱयावर पाच बळी मिळवित ऑस्ट्रेलियन विजयाचा पाया रचला होता. सीम व स्विंग गोलंदाजीवरील भारतीय फलंदाजांचे तंत्र पुन्हा एकदा उघडे पडले आणि केवळ 26 षटकांतच भारताचा डाव 117 धावांत गुंडाळला. स्टार्कला सीन ऍबटने 3 व नाथन एलिसने 2 बळी घेत सुरेख साथ दिली. स्टार्कने पहिल्या स्पेलमध्येच 4 बळी मिळविल्यानंतर ऍबट व एलिस यांनी तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळला. भारताच्या केवळ चारच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. कोहलीने काही वेळ थोडाफार प्रतिकार करीत 31 चेंडूत 35 तर अक्षर पटेलने आकर्षक फटकेबाजी करीत 2 षटकारांसह नाबाद 29 धावा फटकावल्या. दोन्ही षटकार त्याने स्टार्कला मारले. याशिवाय जडेजाने 16 व कर्णधार रोहित शर्माने 13 धावा जमविल्या. सूर्यकुमार यादव सलग दुसऱयांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सिराजचा त्रिफळा उडवित स्टार्कने भारताचा डाव संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक ः भारत 26 षटकांत सर्व बाद 117 ः रोहित शर्मा 13, गिल 0, कोहली 31 (25 चेंडूत 4 चौकार), सूर्यकुमार 0, केएल राहुल 9, हार्दिक 1, जडेजा 16, अक्षर पटेल नाबाद 29 (29 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), कुलदीप यादव 4, शमी 0, सिराज 0, अवांतर 14. गोलंदाजी ः स्टार्क 5-53, सीन ऍबट 3-23, नाथन एलिस 2-13.
ऑस्ट्रेलिया 11 षटकांत बिनबाद 121 ः हेड नाबाद 51 (30 चेंडूत 10 चौकार), मार्श नाबाद 66 (36 चेंडूत 6 चौकार, 6 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी ः शमी 0-29, सिराज 0-37, अक्षय 0-25, हार्दिक 0-18, कुलदीप 0-12.