खानापूर नगरपंचायतीची कारवाई : ठोस निर्णयासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या वाहतुकीच्या कोंडीवर तरुण भारतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसापूर्वी राजा छत्रपती चौक ते लक्ष्मी मंदिपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या पदपथावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. मात्र पुन्हा दोनच दिवसानी पदपथावर पूर्वीप्रमाणेच अतिक्रमण झाले आहे. तसेच अशास्त्रीय चुकीचे पदपथ तयार करण्यात आले आहे. याच्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे सोडून दुकानाचे फलक काढणे, रस्त्यावरील सामान बाजूस काढणे अशा जुजबी कारवाईचे नाटक करण्यात आले आहे. मात्र शहरातील वाहतूक समस्या जैसे थे आहे.
शहरात राजा छत्रपती स्मारक ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत कायम वाहतुकीची कोंडी होत आहे. याबाबत नगरपंचायतीने काहीही ठोस उपाययोजना हाती घेतलेली नाही. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या बैठकीत शिवस्मारकासमोरुन प्रवेश बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला होता. त्यामुळे शहरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. तसेच या भागातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाबाबत विरोध दर्शविला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध करून या समस्येबाबत वाच्या फोडली होती. यासाठी नगरपंचायतीने गेल्या पाच दिवसापूर्वी मुख्य रस्त्यावरील पदपथावर व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. याबाबतचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले. आणि कारवाई करत असल्याचे जाहीर केले. ही कारवाई झालेल्या दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा पदपथावर व्यापाऱ्यांनी आपले दुकानाचे सामान थाटलेले आहे. या रस्त्यावरील गटारीवर जे पदपथ बांधण्यात आलेले आहे. ते अशास्त्रीय तसेच चुकीचे असून यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहने लावण्यास अडथळा होत असून दुकानासमोर वाहने उभी केल्यास रस्त्यावर वाहतुकीची केंडी होत आहे. ही समस्या पदपथ निर्माण केल्यापासून झालेली आहे. यासाठी हे चुकीचे तयार करण्यात आलेले पदपथ काढणे आवश्यक आहे. याबाबत वारंवार मागणी करूनदेखील नगरपंचायत कारवाई करण्यास धजावत नाही. जर दोन्ही बाजूचे पदपथ काढून रस्त्याच्या समांतर पातळीवर गटारीवर स्लॅब टाकल्यास दुचाकी वाहने पाच फुटापर्यंत आत जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही बाजूची मिळून दहा फूट जागा दुचाकी वाहनांना मिळते. त्यामुळे वाहतुकीची समस्या कायमस्वरुपी निकालात निघेल. मात्र नगरपंचायत हे करण्यास धजावत नसल्याने शहरवासियांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
शहरातील अनेक ठिकाणची चांगली गटारे काढून नवीन गटारींची निर्मिती करण्यात येत आहे. हाच निधी या ठिकाणी वापरल्यास निश्चित शहरातील शोभाही वाढेल आणि वाहतुकीची समस्याही निकालात निघेल. महालक्ष्मी यात्रेच्या दरम्यान या रस्त्यावरील फळ व भाजीविक्रेत्यांना हेस्कॉमच्या मागील बाजूस दुकानगाळे निर्माण करण्याचे आश्वासन देवून त्यांना या ठिकाणी बसविण्यात आले आहे. त्यावेळी छोट्याछोट्या दुकानांचे मार्किंगही केले होते. मात्र गेल्या तीन वर्षात या ठिकाणी हे दुकानगाळे निर्माण केलेले नाही. त्यामुळे हेस्कॉमच्या बाजूच्या गल्लीत देखील फळ आणि भाजी विक्रेत्यांमुळे गर्दी होत असून या ठिकाणी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. यासाठी नगरपंचायतीने तातडीने छोटे दुकान गाळे निर्माण करून फळ आणि भाजीविक्रेत्यांची समस्या निकालात काढावी, अशी मागणी होत आहे.