विचित्र हवामानाचा नगदी पिकावर परिणाम, काजू, आंबा उत्पादनात लक्षणीय घट
खानापूर : तालुक्यात हवेतील उष्णता प्रचंड वाढली असून तालुक्यातील नदी, नाले, तळ्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. तसेच हवामानाची विचित्र परिस्थिती पाहता शेतकरी हवालदिल झाला असून वळीव पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. दरवर्षी होळी, गुढीपाडव्या या दरम्यान वळिवाच्या पावसाना सुरुवात होते. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे सुरू होतात. तसेच काजू, आंबा, फणस, मिरची, ऊस या पिकांसाठी हा वळिवाचा पाऊस पोषक असतो. मात्र यावर्षी वळिवाच्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन महिन्यापासून हवामानातील विचित्र स्थिती पाहता वळीव पाऊस लवकर होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्याभरापासून हवेतील उष्णता प्रचंड वाढली असली तरी पहाटे आणि रात्री थंडी पडत आहे. तर अधूनमधून सोसाट्याचे वारेही सुटत आहेत. तसेच दाट धुके पडून चिकट दव पडत असल्याने काजू, आंबा या पिकांचा मोहोर जळून गेला आहे. तसेच या विचित्र हवामानाचा परिणाम मिरची पिकावरही झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
धुक्यामुळे मोहोर जळून गेल्याने आंबा-काजू उत्पादनात लक्षणीय घट
य् ाा विचित्र हवामानाचा फटका काजू व आंबा पिकावर झाला असून आंबा व काजूला आलेला मोहोर पाहता यावर्षी उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशा अपेक्षेत शेतकरी होता. मात्र गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या धुक्यामुळे मोहोर जळून गेल्याने आंबा व काजू पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नगदी पिकाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. परिणामी शेतकऱ्यांची चोहोबाजूनी कोंडी झाली आहे. निदान येत्या दोन-तीन दिवसात वळिवाच्या पावसाने हजेरी लावल्यास पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू होण्यास पोषक वातावरण होईल. तसेच ऊस व मिरची पिकाला हा होणारा पाऊस वरदान ठरणार आहे.