भारतीय भूगर्भ संशोधकांच्या सर्वेक्षणाचे मोठे यश
► वृत्तसंस्था / जयपूर
जम्मू-काश्मीरपाठोपाठ आता राजस्थानमध्येही मौल्यवान लिथियम धातूचे भांडार सापडले आहे. भारतीय भूगर्भ संशोधक विभागाच्या व्यापक सर्वेक्षणातून हा शोध लागला आहे. या वृत्तामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक आणि वाहन उद्योगांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाल्याचे दिसत असून हा नवा साठा भारताची या धातूची 80 टक्के आवश्यकता पूर्ण कऊ शकतो, असे प्रतिपादन करण्यात येत आहे.
राजस्थानात सापडलेला हा लिथियमचा साठा काश्मीरमध्ये सापडलेल्या साठ्यापेक्षाही मोठा आहे. त्याचे नेमके वजन हेतुपुरस्सर गुप्त ठेवण्यात आले आहे. आणखी व्यापक सर्वेक्षण केल्यानंतर अधिक मोठे साठे सापडू शकतील, अशी स्थिती असल्याचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.
सर्वात मोठे भांडार
राजस्थानात सापडलेला हा लिथियमचा साठा भारतातील सर्वात मोठा असल्याचे अनुमान आहे. याची किंमत अब्जावधी डॉलर्स किंवा काही लाख कोटी ऊपये असण्याची शक्यता आहे. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत वाहन युगात लिथियमचे औद्योगिक मूल्य सर्वाधिक आहे. या धातूशिवाय हे उद्योग आकाराला येऊच शकत नाहीत. भारत आजवर या धातूंच्या संबंधात परावलंबी होता. अद्यापही भारताला हा धातू आयात करावा लागतो. पण आता एकापेक्षा एक मोठे साठे सापडल्याने भारताचे महत्व वाढणार हे निश्चित, असे तज्ञांचे मत आहे.
सर्वेक्षणाचा धडाका
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून देशात सर्वत्र, लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि अन्य अतिमहत्वाच्या धातूंचा शोध घेण्यासाठी भूगर्भ सर्वेक्षण विभागाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. यासाठी मोठी गुंतवणूकही केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी 100 हून अधिक शोध अभियान हाती घेण्यात येत आहेत. आतापर्यंत जेवढे सर्वेक्षण झाले नव्हते, तेव्हढे या आठ वर्षांमध्ये झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. दुर्मिळ धातूंप्रमाणेच सोने, चुन्याचा दगड, तांबे आणि मोठ्या प्रमाणात सापडणारी खनिजे शोधण्यासाठी योजना सज्ज करण्यात आल्या आहेत. या अभियानांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होत असून भारतात अपेक्षेहूनही अधिक खनिज संपत्ती आहे, असे आता दिसत आहे, अशी माहिती भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वच्छ ऊर्जेसाठी उपयुक्त
जागतिक तापमानवाढ रोखायची असल्यास प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. अशा ऊर्जेच्या निर्मितीसाठी लिथियम हा धातू महत्वपूर्ण आहे. त्यामुळे याचे साठे देशात असणे, हे अत्यंत निर्णायक ठरणार असून पुढच्या काळातील जागतिक आर्थिक समीकरणे अशा धातूंच्या उपलब्धतेवर निर्धारीत होणार आहेत, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
लिथियमचा उपयोग
ड लिथियम हा दुर्मिळ धातूंपैकी एक असून अत्याधिक महत्वाचा आहे
ड विद्युत वाहने, मोबाईल यांच्या बॅटरीजसाठी अत्यावश्यक असा पदार्थ
ड इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या निर्मितीत याची सर्वाधिक आवश्यकता
ड सध्या चीनची या धातूवर मक्तेदारी, भारत ती मोडण्याच्या तयारीत
ड लिथियमच्या शोधामुळे भारताचा इलेक्ट्रॉनिक्समध्ये दबदबा वाढणार