कोणाला कशाचा मोह होईल आणि त्याचा परिणाम काय होईल, हे सांगता येणे कठीण आहे. अनेकांना हिंस्त्र प्राणी पाळण्याचा आणि त्यांच्यावर लहान मुलांवर केली जाते तशी माया करण्याचाही छंद असतो. पण हे प्राणी माणसाची ही भावना समजून घेतलीच असे नाही. काहीवेळा त्यांच्यातील ‘पशू’ जागा होतो आणि ते आपल्या अन्नदात्यालाही संपवून टाकायला मागे पुढे पहात नाहीत. अर्थातच, हा त्यांचा दोष नसतो. त्यांना पाळण्यात माणूसच धोका पत्करत असतो.
कंबोडिया या देशाची राजधानी नॉम पेन्ह पासून नजीकच्या खेड्यात लुआ नम नामक शेतकऱ्यावर अशीच वेळ आली. त्याने आपल्या शेतात मगरी पाळल्या आहेत. थोड्याथोडक्या नव्हे, तर 40 मगरींचा तो मालक होता. 72 वर्षे वयाचा हा शेतकरी त्यानेच पाळलेल्या मगरींची अंडी वेगळी करण्यासाठी आणि काही अंडी घेण्यासाठी मगरी पाळलेल्या भागात गेला. त्याचवेळी एका मगरीची मूळची प्रवृत्ती जागी झाली. तिने त्याचा पाय आपल्या जबड्यात धरुन त्याला पाण्यात पाडले. नंतर चाळीसही मगरी त्याच्यावर अक्षरश: तुटून पडल्या. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन त्यांनी त्यांनी त्यांवर ताव मारला. लुआ नम सुरवातीला किंचाळला. पण त्याला सोडविण्यासाठी आजूबाजूचे कोणीही पुढे आले नाही. कारण गाठ 40 मगरींशी होती. त्याला वाचवायला जाऊन आपला जीव गमावण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती. अखेर लुआ नमचा या दुर्घटनेत जीव गेला.
त्याचा मृत्यू अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. हिंस्त्र प्राणी, जे माणसाळत नाहीत, त्यांना पाळायचे असेल तर आधी त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे. तसेच त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा संताप जागा करणे टाळले पाहिजे. त्यांना पाळणाऱ्या माणसाला जरी ते प्राणी जवळचे वाटत असले तरी त्यांना माणूस जवळचा वाटतोच असे नाही, ही बाब सदैव ध्यानात ठेवली पाहिजे, असा सल्ला या घटनेच्या निमित्ताने अनेक पशूतज्ञांनी दिला आहे.