पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 9 वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले.
मोदी सरकारच्या 9 वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेल्या 9 वर्षांत देशाला दहशतवादापासून मुक्त करणाऱ्या मोदी सरकारने जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले आहे. गोरगरीब, वंचित वर्गाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे महत्वाचे काम मोदी सरकारने केले. गरीब कल्याण योजनेद्वारे 80 कोटी जनतेला मोफत अन्न धान्य दिले जात आहे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी 2.5 कोटी घरे आणि 11. 72 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. 9 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना उज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलिंडर दिला जात आहे, या योजनेतील सिलेंडरवर 200 रुपये सबसिडीही दिली जात आहे. आयुष्मान योजनेतून 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जात आहेत. करदात्यांच्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोदी सरकारने डीबीटी प्रणाली प्रत्यक्षात आणली आहे.
कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लसीचे 220 कोटी डोस मोफत देऊन लसीकरण अभियान प्रभावीपणे अंमलात आणले. याच काळात जगभरात अडकलेल्या लाखो भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणले गेले. सीरिया, येमेन, युक्रेन आदी देशांत अडकलेल्या 20 हजारांहून भारतीयांना मोदी सरकारने भारतात आणले. मोदी सरकारच्या कामगिरीमुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.