राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या कार्याध्य़क्षांच्या निवडीला भाकरी फिरवणे असं म्हणत नसून ही निव्वळ धूळफेक असल्याची टिका भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या या खोचक टिकेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीने काय करावं आणि काय करू नये हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत माध्य़मांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नविन राष्ट्रिय कार्यकारणीवर खोचक टिका केली आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही तर निव्वळ धूळफेक आहे. राष्ट्रवादीतील फेरबदल करणे किंवा अजित पवार यांची नाराजी हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. मात्र, याला भाकरी फिरवणे असे म्हणत नसून ही धुळफेक आहे.” असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या या टिकेवर अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले असून हा आपला अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे, ते म्हणाले, “शरद पवार हे भाकरी फिरवण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. भाकरी फिरवली हे फक्त माध्यमांनी चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी काय म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण, पक्षांतर्गत भाजपाने काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. तसा राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. टीका-टिप्पणी करणं त्यांचं काम आहे. फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्वं दिलं पाहिजे, असं वाटत नाही,” असंही अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.